नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. त्यामुळे आता या पराभवाचा विचार करण्यासाठी आणि पराभवाचा आढावा भाजपकडून घेण्यात येत आहे. त्यातच आता दोन्ही राज्यातील नुकसानाची मिमांसा करताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यांमधील नुकसानाला विरोधक जबाबदार नसून भाजपचेच सर्व प्रभारी अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून दोन्ही राज्यामध्ये प्रभारी वर्गाची नेमणूक केली होती. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निकालांचा आढावा घेताना दोन्ही राज्यांमधील त्यांची जागा विरोधी पक्षांमुळे नव्हे तर आमच्याच लोकांमुळे कमी झाल्या असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दोन्ही राज्यांमधील मुख्यालयातील प्रभारी, निवडणूक प्रभारी आणि निवडणूक संबंधित इतर अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
लोकसभा किंवा विधानसभा पोटनिवडणुका घेण्यात आल्या त्या सर्व राज्यांमधील पक्षाच्या कामगिरीचा आढावा आता पक्षाच्या हायकमांडकडून घेण्यात येणार आहे. तसेच पक्ष हितसंबंधांविरूद्ध काम करणाऱ्यांची माहिती घेवून अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपाची सर्वात मोठी चिंता ही गुजरातमधील पोटनिवडणूकची आहे कारण शहा आणि मोदींनी प्रयत्न करूनही पक्षाने कॉंग्रेसला एक जागा गमावली आहे. तसेच भाजपने ज्या जागांवर विजय मिळविला त्या जागांवरही विजयाचे अंतर फारच कमी राहिले असल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य पक्ष युनिटनेही पक्ष विरोधी काम करणाऱ्यांची नावे हाय कमांडला पाठविली आहेत. असा विश्वास आहे की सर्व राज्यांचा आढावा संपल्यानंतर पक्ष कडक कारवाई करण्याची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे.