नवी दिल्ली : पोलिसांना भेडसावणाऱ्या उत्तम कार्यालयीन वातावरण, आरोग्य आणि कुटूंब कल्याण योजनांसाठी केंद्र सरकार कालबध्द कार्यक्रम हाती घेईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी सांगितले.
पोलिस हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिल्यानंतर पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या मेळाव्यात शहा बोलत होते. ते म्हणाले, आपल्या देशासाठी अहोरात्र कटीबध्द असणाऱ्या या खाकी वर्दीतील पुरुष आणि महिलांमुळेच भारत जगात एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळखला जात आहे. आदर्श स्थितीत प्रती लाख माणसांमागे 222 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात 144 कर्मचारी आहेत. मात्र तरीही ते करीत असलेले कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे 90 टक्के पोलिसांना 12 तास सेवा बजावावी लागते. त्यातील तीन चतुर्थांश लोकांना साप्ताहिक सुटीसुध्दा मिळत नाही.
आमच्या सरकारने पोलिस कल्याणासाठी बरेच काही केले. याहूनही आम्ही खूप काही करू. आरोग्य, निवास, कुटूंब कल्याणआणि उत्तम वातावरणातील निश्चित सेवा कालावधी देण्यासाठी आम्ही पावले उचलू, असे मी आश्वासन देत आहे, असे शहा म्हणाले.
सेवेत असताना हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुबीयांना मी आणि या देशातील नागरिक वंदन करत आहेत. पोलिस त्यांची नियमित सेवा बजावतात, त्याचे आम्हाला अप्रुप नसते. पण त्याचा सखोल विचार केल्यास देश प्रगतीच्या वाटेवर पोलिसांच्या समर्पित आणि नि:शब्द सेवेमुळे जात आहे, हे लक्षात येईल. दहशतवादी ते घुसखोर आणि नक्षलवादी ते रस्तावरील वाहतूक व्यवस्थापन अशा साऱ्या आव्हांनाना पोलिसांना सामोरे जावे लागते. जगात भारत एक बलशाली राष्ट्र म्हणून उदयाला येण्याससाठी सशक्त स्थान निर्माण करण्यास पोलिस जबाबदार आहेत, असे शहा म्हणाले.