श्रीकांत येरूळे
आपल्या स्वातंत्र्याला सत्तर वर्षे उलटली तरी आपल्याला मतदानाचे महत्त्व तितकेसे समजलेले दिसत नाही. मतदान करा म्हणून लोकांना सांगावे लागतेय, हाच खरा लोकशाहीतील विरोधाभास आहे.
देशभरामध्ये मतदान करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मग त्या निवडणुका लोकसभेच्या असो अथवा विधानसभेच्या! या जनजागृतीसाठी निवडणूक आयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रयत्न करते. भारतीय लोक सुशिक्षित झाली, प्रगल्भ झाली मात्र राजकीय प्रगल्भता आपल्यात म्हणावी तशी आलेली नाही. मेरा भारत महान आपण म्हणतो खरे,परंतु ज्यावेळी आपल्यावर राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची वेळ येते त्यावेळी मात्र आपण जाणीवपूर्वक त्याला टाळतो.आजही आपल्याकडे सरासरी साठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होत नाही. सगळ्यांना या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. तरी मतदानाची टक्केवारी काही वाढताना दिसत नाही.
मतदानादिवशी राष्ट्रीय सुट्टी असतानाही मतदान सोडून आपण सगळ्या गोष्टी करतो! मुळामध्ये आपल्याला आपल्या मताची किंमतच समजलेली नाही आणि विशेष म्हणजे माझ्या एका मताने काय फरक पडतो, ही धारणा कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे दिसते. 2008 च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत एका मतामुळे सी. पी. जोशी यांचा पराभव झाला होता तसेच एका मताने अटलजींचे सरकार पडले होते. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वपूर्ण असते. समकालीन स्थितीमध्ये लोकशाही हीच सर्वाधिक यशस्वी व्यवस्था आहे. यामध्येही दोष नक्कीच आहेत मात्र इतर व्यवस्थांच्या तुलनेत ते कमी आहेत.
नोटाचा एक चांगला पर्याय नागरिकांना उपलब्ध झाला आहे. आपल्याला कोणताच उमेदवार आवडला नाही तर आपण नोटाचा पर्याय वापरू शकतो.सध्या जरी नोटाच्या पारड्यात जास्त मते पडली तरी निवडून येणारा उमेदवार निवडून येतोच!भविष्यात नोटाच्या वापराबद्दल एक बदल करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोग यावर विचार करेल अशी आशा व्यक्त करू या! तो बदल म्हणजे, जर नोटाला जास्त मते पडली तर त्या संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेऊन अगोदरच्या सर्व उमेदवारांना ती निवडणूक लढविण्यास बंदी घालत, दुसऱ्या इच्छुक उमेदवारांना संधी दिली जावी. जेणेकरून योग्य उमेदवार निवडला जाईल.
सध्याची राजकीय स्थिती अत्यंत भयानक अशी झालेली आहे. विचारसरणी, पक्षनिष्ठा, तत्त्व, मूल्य या गोष्टी संपल्यात जमा आहेत.आपला स्वार्थ हाच एकमेव विचार सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात दिसतो. अशा स्थितीमध्ये नवमतदार गोंधळून जातोय!त्यात पुन्हा उमेदवार घराणेशाहीसकट लादले जाताहेत. यामुळे आपली बाजू कोणती याबद्दल या नवमतदारांमध्ये संभ्रम आहे. काळ कितीही बदलला, नेते कितीही श्रीमंत झाले तरी त्यांना मते मागण्यासाठी दर पाच वर्षांनी सामान्य नागरिकांकडे येणे भाग असतेच. ही एक लोकशाहीची जमेची बाजू आहे. अन्यथा, नागरिक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात शोधूनही सापडला नसता! आणखी एक बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेतून सामान्य नागरिक वंचित ठरविला जात आहे. त्याची इच्छा असतानाही तो निवडणूक लढवू शकत नाही. कारण सामान्य माणसाला परवडतील अशा कोणत्याच निवडणुका सध्या उपलब्ध नाही. यामध्ये ग्रामपंचायतीपासून पुढील सर्व निवडणुका येतात. हे भारतीय लोकशाहीचे अपयश आहे.
निवडणूक आयोगाने हा लोकशाहीचा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना मतदानाचा हक्क बजावताना अडचण येऊ नये म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील पाच हजार चारशे मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित केली आहेत. मतदार जागृतीसाठी सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थी, तरुण, शिक्षक, व्यावसायिक, शेतकरी, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक हे अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करीत आहेत. सायकल रॅली, प्रभात फेरी, रांगोळी असे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच आयोगाने मतदारांसाठी विशेष सोयीसुविधांची निर्मिती केलेली आहे. नागरिकांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके करून दाखविली जात आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी 96 हजार 661 मतदान केंद्रे असणार आहेत. ज्यासाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील 106 मतदान केंद्रेही संपूर्णपणे दिव्यांगांद्वारे संनियंत्रित केली जाणार आहेत. तसेच महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण केली जाणारी 352 सखी मतदानकेंद्रे असणार आहेत. तसेच 9 हजार 673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेब कास्ट केले जाणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदार जागृतीच्या मोहिमेसाठी आपापल्या क्षेत्रात उत्तम काम केलेल्या काही सदिच्छादूतांची नेमणूक आयोगाने केली आहे. ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, प्रथमोपचार, दिव्यांग मित्र तसेच सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असणारी मतदान केंद्राची रचना करण्यात आलेली आहे.
लहान मुलांसह मतदानास येणाऱ्या महिलांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजीलपची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. ज्याचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा निवडणुकीच्या या लोकशाही पर्वात सहभागी होत आहे. तर आपणही एक नागरिक म्हणून यामध्ये सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे.
नवमतदारांचे मत या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. आज रोजी राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख मतदार आहेत. या तरुण मतदारांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य उमेदवाराला निवडून देत, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाविषयी खूप चांगला विचार मांडला आहे. ते म्हणतात की, तुमच्या मताची किंमत मीठ-मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणाऱ्या इतके कंगाल कोणीच नसेल. हा विचार आचरणात आणत आपले अमूल्य मत विकू नका, कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका! चला तर मग लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊ या आणि निर्भीडपणे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू या!