संगमनेर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ऐंशी वर्ष असूनही ते एखाद्या तरूणासारखे राज्यात प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजप सरकार घाबरले. त्यामुळे पवारांना ईडीची नोटीस पाठविली. मात्र, ते घाबरले नाहीत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीला चांगले वातावरण असून आघाडीला राज्यात दिडशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संगमनेर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शहराध्यक्ष प्रशांत वामन, सरूनाथ उंबरकर, नगरसेवक किशोर टोकसे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरण घोटेकर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची व मित्रपक्षांची आघाडी झाल्याने राज्यात चांगले वातावरण आहे. संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये यापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संधी देणार असल्याचेही ते म्हणाले.
आबासाहेब थोरात म्हणाले, आ. थोरात यांनी सहकार, शिक्षण व दूध व्यवसायातून समृद्ध झालेला संगमनेर तालुका विकासाच्या माध्यमातून पुढे नेला. पुरोगामी विचारांचे सर्व मित्रपक्ष व जनता यांचा त्यांना पाठिंबा असून विरोध करण्यासारखा एकही मुद्दा तालुक्यातील विरोधकांकडे नाही. या तालुक्यात विरोधकांचे एक विधायक काम नाही. त्यामुळे सर्वांनी आपल्यातील मतभेद विसरुन आ. थोरात यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.