हडपसर – कोट्यवधी रुपयांची विकासकामे मतदारसंघात आणल्याच्या खोट्या गप्पा मारण्याशिवाय आमदारांना काही येत नाही. भ्रष्टाचारी म्हणून हडपसरला काळीमा फासण्याचे काम गेल्या पाच वर्षांत झाले आहे आणि हाच भ्रष्टाचार संपण्यासाठी एक लाखाचे मताधिक्य घ्यायचे आहे, असा विश्वास महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी व्यक्त केला.
महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा हडपसर माळवाडी रोड येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चेतन तुपे बोलत होते.
ते म्हणाले 7 हजार कोटी खर्च केले असे वारंवार सांगितले जाते. मग आमदार साहेब विकास गेला कुठे? त्याला हडपसरच्या जनतेने कुठं शोधायचं? आमदारांना वर्षाला 2 कोटींचा निधी मिळतो, पाच वर्षांचा हिशेब धरला, तर 10 कोटींची कामे होणे अपेक्षित आहे. गंमत म्हणजे यापैकी 1.60 कोटींचा निधी वापराविना पडून राहिल्याने परत गेल्याची नामुष्की ओढविली आहे. वाट्टेल ती आकडेवारी फेकणाऱ्या आमदारांचा 7 हजार 95 कोटींचा आकडा म्हणजे हडपसरवायियांसाठी मृगजळच ठरलं आहे, असा आरोपही तुपे केला.
त्यांच्या पोकळ विकासकामांचा डोलारा कधीही कोसळू शकतो हे सय्यदनगर रेल्वेगेट वारंवार दुरुस्ती करावे लागल्याने सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता जनताच त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. हडपसरने स्व. विठ्ठल तुपेंसारखे विकासगंगा आणणारे नेतृत्व बघितले. आता शरद पवार यांनी उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखविला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी मी शर्थीवे प्रयत्न करेन. या लढाईत हडपसरवासीय मला नक्की साथ देतील, अशी साद चेतन तुपे यांनी घातली.