अपर्णा देवकर
स्वच्छता, तिकिटातील विलंब आदी रेल्वेप्रवाशांना मनस्ताप देणाऱ्या मुद्द्यांना हात घालत त्याबाबत दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राहिले आहे. आता एक पाऊल पुढे टाकत देशातील पहिलीवहिली खासगी रेल्वे सुरू करून सरकारने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तेजस एक्स्प्रेस नामक ही रेल्वे रेल्वेच्या विस्तार धोरणाला प्रोत्साहन देईल आणि विभागावर वाढणारा आर्थिक बोजा कमी करण्यास हातभार लावेल, अशी अपेक्षा आहे.
भारतीय रेल्वे ही जगभरासाठी कौतुकाचा विषय. दररोज सुमारे 20 हजार पॅसेंजर रेल्वेने धावतात आणि त्यातून लाखो प्रवासी इच्छितस्थळी पोहोचतात. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचा वेग वाढत असून गुणवत्तेकडेही काही प्रमाणात लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेचा विषय देखील अजेंड्यावर राहिलेला आहे. असे असले तरी प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची खात्री मिळत नाही. तसेच बारा महिने हाउसफुल्ल धावणारी रेल्वे तोट्यात कशी, असा सामान्यांना पडणारा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही.
पण सध्या भारतीय रेल्वे कात टाकताना दिसते आहे. रेल्वे तत्पर, स्मार्ट आणि व्यावसायिक पातळीवर सेवा देण्याच्या प्रयत्नाला लागली आहे. रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ठेवणे, ती सुंदर दिसावी यासाठी विविध प्रयत्न करण्याबरोबरच रेल्वे विभाग प्रवाशांना जागतिक पातळीवरील सुविधा देण्यासाठी खासगी रेल्वे सेवेला सुरुवात केली आहे. रेल्वे स्टेशनची परिस्थिती सुधारण्यासाठी रेल्वे 2016 पासून थर्ड पार्टीकडून लेखा परीक्षण आणि स्वच्छता रॅकिंग करत आहे.
नियमित केल्या जाणाऱ्या स्वच्छता रॅकिंगमध्ये या वर्षी राजस्थानमधील जयपूर, जोधपूर आणि दुर्गापुरा या 3 रेल्वे स्थानकांना उच्च स्थान मिळाले आहे. तर उपनगरीय रेल्वेच्या स्थानकांच्या श्रेणीमध्ये मुंबईतील अंधेरी, विरार आणि नायगाव ही स्थानके सर्वोच्च स्थानी आहेत. या सर्वेक्षणामुळे सर्वच स्थानकांतील अधिकाऱ्यांमध्ये एक चांगली स्पर्धा सुरू होती ज्याचा फायदा रेल्वेच्या प्रवाशांना झाला.
रेल्वे ही भारतीयांच्या आयुष्याशी जोडलेले अभिन्न अंग आहे, रेल्वेची
स्वतःची एक संस्कृतीही आहे. काही वर्षांपूर्वी एक बातमी आली होती की बिहारमधील सासाराम स्टेशनच्या एका फलाटावर शहरातील अनेक मुलंमुली अभ्यास करत आहेत, काही जण स्पर्धा परीक्षेचीही तयारी करतात. आजही अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये रेल्वे स्टेशनवरच वीज उपलब्ध असते आणि प्यायचे पाणीही बहुतांश वेळा रेल्वे स्टेशनवरच मिळते. त्याशिवाय रेल्वे स्टेशनवर चोवीस तास चहा, कॉफी आणि अन्य खाद्यपदार्थ मिळतात.
रात्री अपरात्री जेव्हा शहरात खाण्यासाठी काहीच मिळत नाही तेव्हा लोक रेल्वेस्टेशनची वाट पकडतात. पूर्वी रेल्वेस्थानकांवर मिळणारे अन्नपदार्थ उच्च दर्जा आणि उच्च स्वादाचे असत, स्थानिक चवीचे पदार्थ तिथे मिळत. त्यावेळी बरेचसे लोक प्रवासाच्या नावाखाली एखाद्या विशेष स्थानकापर्यंत जाऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेऊन पुन्हा परत जात असत. अशा प्रकारची एक संस्कृतीच रेल्वे स्थानकांच्या भोवतीने निर्माण होत असे. म्हणून रेल्वे स्थानकांची सुधारणा, सौंदर्यीकरण करणे हे एका अर्थी भारतीय लोकजीवनाला नवे रूप देण्याचाच प्रयत्न आहे. रेल्वे विभागाचा हा प्रयत्न नक्कीच सफल होऊन नव्या रूपातील रेल्वे आपल्या सेवेसाठी सज्ज होईल अशी अपेक्षा नक्कीच करू शकतो.
दुसरीकडे, रेल्वने आता खासगी क्षेत्रासारखी सेवा देण्यास सुरुवात केली आहे, त्या अंतर्गत पहिली खासगी रेल्वे तेजस एक्स्प्रेसची सुरुवात झाली आहे. अलीकडेच लखनौमध्ये या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. लखनौ ते दिल्ली असे अंतर कापणाऱ्या या देशातील पहिल्या कॉर्पोरेट ट्रेनमध्ये अनेक नवे प्रयोग केले गेले आहेत. या रेल्वेमध्ये विमानात देतात तसा व्यक्तिगत एलसीडी मनोरंजन तसेच माहितीची स्क्रीन ऑन बोर्ड वाय फाय सेवा, आरामशीर आसनव्यवस्था, मोबाइल चार्जिंग, व्यक्तिगत रिडींग लाइट आणि मॉड्युलर बायो टॉयलेटची सुविधा असेल. या रेल्वेच्या प्रवाशांना विलंबाबद्दल नुकसानभरपाई देखील मिळणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने तेजस एक्स्प्रेसचे भाडेही जाहीर केले आहे. ही रेल्वे आठवड्यात सहाही दिवस धावणार आहे. रेल्वेचा विलंब ही सर्वसाधारण बाब मानली जाते. मात्र, तेजसला यापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. रेल्वेला पोहोचण्यास विलंब झाल्यास प्रवाशांना त्याची भरपाई मिळेल. एक तासापेक्षा अधिक उशीर झाल्यास प्रवाशांना शंभर रुपये तर दोन तास उशीर होत असल्यास 250 रुपये मिळणार आहेत. मंगळवार वगळता सहा दिवस तेजस धावणार आहे.
लखनौहून ही रेल्वे सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी रवाना होईल, तेथून ती कानपूरला थांबेल. तेथून 7 वाजून 25 मिनिटांनी निघेल व गाझियाबादला 11 वाजून 43 मिनिटात पोहोचेल. या ठिकाणी 11.45 मिनिटांनी निघालेली रेल्वे नवी दिल्लीला 12 वाजून 25 मिनिटाला पोहोचेल. नवी दिल्लीहून ही रेल्वे सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी परतीचा प्रवास सुरू करेल. सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी गाझियाबादला तर रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी लखनौला येईल.
रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू होती. पण आता देशातील पहिली खासगी रेल्वे धावू लागल्यामुळे सर्वांनाच धक्का बसणार आहे. हा धक्का सुखदही असेल आणि पारंपरिक विचार करणाऱ्यांसाठी बोचणाराही असेल. पण रेल्वेचे कायापालट होण्यासाठी शिस्तबद्धता देखील आवश्यकच होती. यातील तेजस एक्सप्रेस आदर्श उदाहरण ठरेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय तेजसचे निकष अन्य एक्स्प्रेसला देखील लागू व्हावेत, अशी आशा प्रवासी बाळगून आहेत. तेजस एक्स्प्रेस ही रेल्वेच्या विस्तार धोरणाला प्रोत्साहन देईल आणि विभागावर वाढणाऱ्या आर्थिक बोजा कमी करण्यास हातभार लावेल. अर्थात या रेल्वेच्या निमित्ताने रेल्वेचे खासगीकरण होणार अशी ओरड सुरू झाली आहे; पण यासंदर्भात रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी समाधानही केले आहे.
रेल्वेने आणखी एका नवीन सेवेची घोषणा केली असून या सेवेच्या माध्यमातून तिकीट बुक करताना तिकीट कन्फर्म नसले तरी ते तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कितपत आहे, याचे आकलन होण्यास मदत मिळणार आहे. रेल्वेतील जेवणावरूनही प्रवाशांच्या तक्रारी असतात. सध्या राजधानी आणि शताब्दीमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचे प्रमाण अधिक आहे. त्यात कपात केली जाणार आहे. जेवणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी हा बदल केला जाणार आहे. भारतीय रेल्वेचे जाळे प्रचंड आहे. परिणामी बदलाची शक्यता आणि विकासाचा वेग हा सुस्तच राहतो. प्रत्येक ठिकाणी एकाचवेळी बदल घडवून आणणे शक्य नाही. मात्र, वेळेवर योग्य बदल केल्यास बदल घडवून आणता येतात.