वेदांतिकाराजे; उदयनराजे, शिवेंद्रराजेंना विजयी करण्याचे आवाहन
सातारा – भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये विकास म्हणजे काय, ते दाखवून दिले आहे. त्यामुळे देशात पुन्हा नरेंद्र मोदींचे सरकार आले असून राज्यातही भाजपचे सरकार पुन्हा येणार आहे. साताऱ्याचाही विकास गतीने होण्यासाठी दोन्ही राजांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आजवर कितीतरी लोकांनी पक्ष बदलले तरी फक्त दोन्ही राजांच्या नावाने विरोधकांचे आकांडतांडव सुरू आहे. आपले नाणे खणखणीत असून त्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतो. मतदारसंघाच्या विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी दोन्ही राजांना मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ करंजे येथील मेहेर देशमुख कॉलनीत झालेल्या कोपरा सभेत त्या बोलत होत्या.
नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, नगरसेवक अशोक मोने, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, मनोज शेंडे, राजू भोसले, स्मिता घोडके, ज्ञानेश्वर फरांदे, विजय काटवटे, माजी नगराध्यक्ष सौ. वैशाली महामुनी, नासीर शेख, प्रकाश बडेकर, जेष्ठ नेते शंकर किर्दत, अतुल चव्हाण, राम हादगे, प्रताप महामुने, बाळासाहेब भुजबळ, सोमनाथ पाटोळे व नागरिक उपस्थित होते.
सातारा शहर हे राजघराण्याचे कुटुंब आहे. दोन्ही राजांमुळे शहरात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. मेडिकल कॉलेज, अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी, मोठ्या औद्योगिक कंपन्या साताऱ्यात आणायच्या असतील, तर सत्तेशिवाय पर्याय नाही. पाच वर्षात तोंड न दाखवणारे भूछत्राप्रमाणे निवडणुकीत उगवतात. त्यांच्या मागे जायचे की, विकासाच्या मागे जायचे, हे ठरवले पाहिजे.
शहराच्या गतिमान विकासासाठी दोन्ही राजांना विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले. सौ. माधवी कदम, बाळासाहेब भुजबळ, विजय काटवटे, डॅनी पवार, श्रीकांत आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शंकर किर्दत यांनी आभार मानले.