पिंपरी – धोकादायकरित्या रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी (दि.30) आकुर्डी रेल्वे स्टेशनवर मध्य रेल्वेच्या पथकाने व स्टेशन मास्टर यांनी मिळून तीन जणांवर कारवाई केली. तर, दोन दिवसांपूर्वी पिंपरी रेल्वे स्टेशनवर याच प्रकारची कारवाई करत 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
काही वेळ आणि अंतर वाचवण्यासाठी प्रवाशी आपला जीव धोक्यात टाकत धोकादायकरित्या रेल्वे रुळ ओलांडत दुसऱ्या बाजूला जातात. अशा प्रकारांमुळे होणाऱ्या अपघातात रोज कुठे ना कुठे तरी नागरिकांना आपला जीव गमावावा लागतो. यावर आळा घालण्यासाठी पुणे लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्टेशनवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून मोहीम हातात घेण्यात आली आहे.
यामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे, तसेच नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. आत्तापर्यंत आकुर्डी, पिंपरी स्टेशनवर कारवाई करण्यात आली आहे. तर, इतर स्टेशनवर कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असून प्रवाशांनी नियमांचे पालन करुन आपल्या जिवाला धोक्यात घालवू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.