पुणे : भारतीय जनता पक्षाने स्वत:च्या जीवावर केवळ 130 जागा मिळवल्या तर कर्नाटकप्रमाणे कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी भीती वाटल्यानेच भाजपाने शिवसेनेला त्यांच्या ताकदीपेक्षा अधिक जागा दिल्या असाव्यात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते मात्र भाजपाने शिवसेनेला अंधारात ठेवण्यासाठीच युतीचं ठरलं अशा बातम्या पेरल्या असाव्यात. युतीची ही चर्चाअखेरपर्यंत ताणवत 2014 प्रमाणेच सेनेला धोबीपछाड देण्याची शक्यताही काही राजकीय नेते व्यक्त करत आहेत.
भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीचे अखेर जमलं अशा बातम्या माध्यामांत झळकत आहेत. मात्र याला कोणत्याही अधिकृत नेत्याने दुजोरा दिला नाही. 122 जागांवर 2019मध्ये विजय मिळवणाऱ्या भाजपा स्वत:कडे 144 जागा घेऊन 62 जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला 126 जागा देईल हे वस्तुत: संभवत नाही. मात्र अशी तडजोड झाली असल्यास भाजपा कोणत्या कारणांमुळे तडजोड करावी लागली असावी याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भारतीय जनता पक्षाची स्वबळाबर सत्ता मिळवण्याची महत्वाकांक्षा लपून राहिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा लोकनेता आता शिवसेनेचे नेतृत्व करीत नाही. त्यामुळे शिवसेनेला कोंडीत पकडण्याची रणनिती भाजपाने 2014मध्ये आखली. मात्र मोदी लाटेतही त्यांचे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न अधुरेच राहीले. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाहेरून पाठींबा देण्याची खेळी केली. त्यामुळे ज्यांच्यावर भलते सलते आरोप करून सत्तेवर आलो त्यांच्या टेकूवर उभे राहण्यापेक्षा शिवसेनेला पाठींब्याचे आवतण देणे भाजपाला सोइस्कर होते.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मंत्रीमंडळाच्या बाहेर कायमच सरकारच्या विरोधात असल्याचा आव आणला पण सरकारमधून ते कधी बाहेर पडले नाहीत. त्यातच 2019च्या निवडणुकीत नोटाबंदी, कोरेगाव भीमा प्रकरण, मंदीची चाहूल, मराठा आरक्षण अशी आव्हाने समोर होती. त्याचवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली. त्यामुळे शिवसेने बरोबर युती करणे क्रमप्राप्त बनले. त्याचा फायदा घेत शिवसेनेने आपली किंमत वाढवून घेतली. विधानसभेला निम्म्या निम्म्या जागांचे वाटप करणार असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले.
निवडणुकीच्या आधी राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना भाजपात घेण्यात आले. या मेगाभरतीमुळे आत्मविश्वास वाढल्याने भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहिली. त्यावेळी शरद पवार यांनी मैदानात उडी घेतली. त्यामुळे एकतर्फी वातावरण निर्मीती झालेल्या या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. त्यातच तरूणांचा पाठिंबा शरद पवार यांना मिळाला.
त्यामुळे स्वबळावर किती जागा मिळतील याची भाजपाने पुन्हा चाचपणी केली त्यात 130 ते 32 जागा मिळतील असा अंदाज आला. अशा परिस्थीतीत कर्नाटकच्या धर्तीवर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार बनवू शकतील या शक्यतेने पुन्हा फडणवीस बॅकफूटवर आले असण्याची शक्यता आहे.