मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. हा राजीनामा तातडीने मंजूर केल्याने अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. या घटनेनंतर अजित पवार यांनी त्यांचा फोन बंद ठेवल्याने याबाबतचे गुढ वाढले आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला.
ईडी कार्यालयाने आपण चौकशीसाठी येण्याची गरज नाही असे कळविल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेथे जाण्याचा नियोजित कार्यक्रम रद्द करून पुण्यातील पावसाने आणि जिल्ह्यातील पुराने बाधित झालेल्यांचे अश्रु पुसण्यासाठी पुण्यात धाव घेतली. नेमक्या याच काळात राजिनाम्याचे हे वृत्त धडकल्याने त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत कुरबुरी आणि शिखर बॅंक घोटाळ्यातील कथित सहभाग यावरून हा राजीनामा दिला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी विधीमंडळाच्या कार्यलयात माझ्या स्वीय सहाय्यकाकडे राजीनामा दिला. मला फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली. राजीनामा पत्रात त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या नेत्यांमध्ये अनेकांचे अजित पवार यांच्याशी सख्य नव्हते. त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी हाती घेतलेल्या शरद पवार यांनी या दौऱ्यात अजित पवार यांना दोन हात दूरच ठेवले होते. धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड या नव्या फळी बरोबर घेऊन ते पक्ष बांधणीची खिंड लढवत होते याकडे राजकीय निरीक्षक लक्ष वेधत आहेत.