राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – शहरात गुरुवारी (दि. 9) झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले होते. वाडा रस्त्यावर गटार तुंबले काही बुजवले गेल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले. काही दुकानात आणि काही गृहप्रकल्पांच्या पार्किंगमध्ये पावसाचे पाणी शिरले.
गेली महिन्याभरापासून वाढतच असलेल्या उकाड्याने नागरिक पुरते हैराण झाले होते. मात्र अखेर गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजगुरूनगर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात काहीसा थंडावा पसरल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला अचानक झालेल्या या वादळी जोरदार पावसामुळे नागरिकांची,
छोट्या व्यावसायिकांची, वीटभट्टी धारकांची मोठी धांदल उडाली. वादळ आणि पावसामुळे शेकर्यांच्या शेतातील नागदी पिकांचे नुकसान झाले. उन्हाळी बाजरी काढणीस आली होती तिचे नुकसान झाले.
वादळी अर्धा तास झालेल्या पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले. राजगुरूनगर शहरात अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत तर पाणी योजना आणि गटार योजनेची कामे गेली चार पाच वर्षांपासून सुरु आहेत. अधर्वट झालेल्या कामांमुळे शहरातील सर्वच ठिकाणी गटार यंत्रणा बंद आहे.
रस्ते केले मात्र गटार व्यवस्था करण्यात आली नाही. शहरात काँक्रिटीकरणाचे रस्ते झाले मात्र पाणी व्यवस्थापन करण्यात नगरपरिषदेला अपयश आले आहे. शहरात वाडा रस्त्यावर अनेक सहकारी गृहरचना प्रकल्प झाले आहेत त्यांनी मुख्य गटारावरील पाणी जाणारी लाइन बुजवल्या आहेत. त्यामुळे पाणी जाण्यासाठी सर्व मार्ग बंद झाले आहेत.
थोडाच पाऊस झाला तर येथे…
वाडा रस्त्यावर संगम क्लासिक, खेड पंचायत समितीजवळ नगर परिषदेच्या जवळ आदी भागात पाणी जाण्यासाठी सोय नाही. त्यामुळे थोडासा पाऊस झाला की सर्वच पाणी रस्त्यावर येऊन तळे साचते त्याचा त्रास स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणा-या नागरिकांना मोठ्या होत आहे. गटाराचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने मोठी दुर्गंधी सुटते याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
पाणी व्यवस्थापन विभागाचा बोजवारा
राजगुरूनगर शहरात आज झालेल्या पावसामुळे वाडा रस्त्यावर पाणीच पाणी झाले. येथील मोरया कॅफे या दुकानात पाणी शिरले तर सौभाग्य नगरी गृहरचना सोसायटीच्या पार्किंमध्ये पाणी साचले. अर्धा एक तास झालेल्या पावसामुळे पाणी व्यवस्थापन विभागाचा बोजवारा उडाला आहे.
नगरपरिषद प्रशासन सुस्त
शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. वास्तविक पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे महिन्यात शहरातील गटारांमध्ये साठलेले कचरा नगरपरिषद प्रशासनाने काढणे आवश्यक आहे.
मात्र तसे होत नाही त्यातच काही भागात गटार नाहीत तर शहरातील सुमारे 38 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. पाऊस पडला तर सर्व पाणी रस्त्यावर येत असल्याने भुयारी गटार योजनेसाठी आलेला निधी पाण्यात गेला आहे. या कामात आता गैरव्यवहार झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
प्रशनासन, नेत्यांची डोळेझाक
पाऊस पडून गेल्यानंतर पुढील तीन चार दिवस शहर चिखलाचे रस्ते असतात. त्यातून मार्ग काढत नागरिकांना जावे लागते. वर्षानुवर्षे या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. नगरपरिषद प्रशासन आणि स्थानिक नेते याकडे डोळेझाक करीत आहेत.
राजकीय नेते पाणी गटार योजनेसाठी राजकारण करीत मते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यात सर्वसामान्य नागरिकांची मात्र ससेहोलपट होत आहे.