मुंबई :ऑनलाईन आणि इंटरनेट बॅंकींगच्या जमान्यात आजही बॅंक ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. अनेकवेळा ऑनलाइन व्यवहार अयशस्वी ठरतात. त्यामुळे आता भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. जर तुमचा ऑनलाइन व्यवहार कोणत्याही कारणामुळे होऊ शकला नाही आणि तुमच्या खात्यातून वजा झालेले पैसे तुम्हाला एक दिवसाच्या आत मिळाले नसतील, तर तुम्ही नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र ठरणार आहात.
आरबीआयच्या नवीन नियमानुसार, ऑनलाइन व्यवहार अपयशी झाल्यानंतर जर ग्राहकांना एक दिवसाच्या आत पैसे परत मिळाले नाही तर बॅंक आणि डिजिटल वॉलेटला ग्राहकांना दर दिवसासाठी 100 रूपये दंड अर्थात पेनल्टी म्हणून द्यावे लागतील. हा नियम यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय), इमिजिएट पेमेंट सिस्टम (आयपीएस), ई-वॉलेट्स, कार्ड-टू-कार्ड पेमेंट आणि नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस यांना लागू असेल. केवळ डिजिटलच नाही तर नॉन-डिजिटल व्यवहारांवर देखील आरबीआयने एक मुदत निश्चित केली आहे. ऑनलाइन पेमेंट्स, एटीएम आणि माइक्रो एटीएमचे व्यवहार झाले नाही तर खात्यात पैसे येण्यासाठी पाच दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. आरबीआयच्या नियमामध्ये म्हटले आहे की, ही रक्कम लवकरात लवकर ग्राहकांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे. ग्राहकांनी तक्रार करण्याची वाट पाहू नये, तर चतकन व्यवहार तरी पूर्ण करावा अथवा ग्राहकाला नुकसान भरपाई तरी द्यावी.