गेले अनेक दिवस चर्चेत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतील ह्युस्टन येथील “हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम काल दिमाखात पार पडला. ज्यांनी हा कार्यक्रम संपूर्ण पाहिला त्यांच्या मनावर मोदींची मोहिनी पुन्हा प्रस्थापित झाल्याशिवाय राहिली नसेल. अफाट गर्दी, देखणे आयोजन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची तेथील पूर्णवेळ उपस्थिती, ही या कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये होती. दोन्ही नेत्यांची भाषणे अत्यंत जोशपूर्ण झाली. स्टेडियममधील “माहोल’ तर एखाद्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सामन्यासारखा जल्लोषी होता.
मोदींच्या भाषणातील प्रत्येक वाक्यागणिक लोक बेभान होताना दिसले. या सगळ्या आयोजनाचा एकत्रित इम्पॅक्ट मंत्रमुग्ध करणारा ठरला. मोदींनी ट्रम्प यांचे कौतुक करणे आणि तितक्याच जल्लोषात ट्रम्प यांनी मोदींच्या नेतृत्वाचा गौरव करणे हे या दोघांनाही राजकीयदृष्ट्या लाभाचे तर ठरणार आहेच; पण भारतात मोदींना आणि त्यांच्या समर्थकांना किमान वर्षभर भांडवल करता येईल इतकी मोठी सामग्री या कार्यक्रमामुळे त्यांना लाभली आहे. मोदींनी जेव्हा “अबकी बार ट्रम्प सरकार…’ असा नारा दिला त्यावेळी आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही मोदींची जादू वापरली जाते आहे, असा दावा करण्यास त्यांचे समर्थक मोकळे राहणार आहेत.
मोदींनी इंग्रजीत ट्रम्प यांच्याविषयी सुरुवातीला केलेले निवेदन आणि त्यानंतर त्यांनी केलेले मुख्य भाषण ऊर्जेने भरलेले होते. “हाऊडी’ म्हणजे “हाऊ डू यू डू’ “तुम्ही कसे आहात’, याचे उत्तर देताना “भारतात एव्हरीथिंग ईज फाईन’ असल्याचे मोदींनी विविध भारतीय भाषांमधून लोकांना ऐकवले. त्यावर भारतीय लोक किती विश्वास ठेवतील, हा प्रश्न वेगळा असला तरी हे वाक्य ऐकून स्टेडियमवरील भारतीयांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण संचारले. ट्रम्पही स्मित करून त्यांच्या या दाव्याला दाद देताना दिसले. “अख्खा भारत आज खुशहाल आहे,’ असे मोदींनी सांगणे भारतातील बहुतेकांना मान्य होणारे नसले तरी जगाच्या व्यासपीठावरून बोलणाऱ्या भारतीय पंतप्रधानाने आपल्या देशाचे हेच चित्र मांडणे गरजेचे असते.
तुम्ही जेव्हा गुंतवणुकीच्या अपेक्षेने एखाद्या देशात जाता त्यावेळी तुम्ही तेथे भारताच्या खराब आर्थिक स्थितीचे रडगाणे गात बसणार असाल, तर तुम्हाला कोणीही गुंतवणूक देणार नाही, हे लक्षात ठेवूनच भारत हा सारे काही आलबेल असलेला देश आहे, हे जगाला भासवणे महत्त्वाचे असते. हे खुबीने पटवून देण्याचे काम मोदींखेरीज अन्य कोणीही करू शकत नाही. वस्तुस्थिती नेमकी काय आहे आणि आपण लोकांना नेमके काय भासवायचे आहे याची पूर्ण जाणीव मोदींना असते. ते तुम्हाला कधीच तुमच्या समस्यांची जाणीव करून देत नाहीत.
उलट तुम्ही किती खुशालीत आहात, हे ते तुम्हाला अशा शैलीत समजावून सांगतात की, क्षणभर तुम्ही तुमच्या पुढच्या समस्याच विसरून जाता. लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात वेळ दवडण्यापेक्षा, तुम्हाला तुमच्या समस्याच विसरायला लावणे, हा मार्ग कधीही चांगला. त्यात मोदी वाकबगार आहेत. गुजरातमध्ये 17 वर्षे त्यांनी जो प्रयोग केला तोच प्रयोग त्यांनी देशपातळीवर केला आणि आता जगाच्या व्यासपीठावरही हाच हातखंडा प्रयोग ते करीत आहेत. लोक त्यांना दाद देत आहेत, “मोदी-मोदी’ या नाऱ्याने ह्युस्टनमधील 50 हजार क्षमतेचे स्टेडियम दुमदुमून जात आहे, उत्तुंग नेतृत्वशैलीचा यापेक्षा आणखी कोणता आविष्कार लोकांना अपेक्षित असतो? अमेरिकेतील भारतीयांना भारताचा असा गौरव होणे हे बघायला निश्चितच आवडले असणार, कारण मायभूमीवरचे प्रेम आणि आत्मियता याच्याशी निगडीत हा भाग असल्याने आपल्या मायभूमीचा प्रमुख शासनकर्ता अमेरिकेच्या अध्यक्षांच्यापुढे भारताच्या विकासाची गौरवगाथा आत्मविश्वासाने मांडत असताना पाहणे, हे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षाला अन्य राष्ट्रप्रमुखांसाठी दहा-वीस मिनिटांचाही वेळ देणे जिथे दुरापास्त तिथे खुद्द राष्ट्राध्यक्षच त्याचे कार्यालय सोडून मोदींच्या संपूर्ण भाषणासाठी व्यासपीठापुढील गर्दीत जाऊन पूर्ण वेळ थांबतो, हे दृष्यही ह्युस्टन स्टेडियमवर उपस्थित असलेल्या 50 हजार भारतीयांसाठी निश्चितच अविस्मरणीय राहिले असेल. त्या अर्थाने हा कार्यक्रम 100 टक्के यशस्वी झाला आहे, असे नि:संदिग्धपणे म्हणता येते. हा सारा कौतुक सोहळा भारतातही सर्वच वाहिन्यांनी थेट प्रसारित केला होता. त्यामुळे भारतवासीयही हा सारा दिमाख पाहून थक्क झाले असावेत.
मोदींचा हा कौतुक सोहळा पाहताना, भारतातील नागरिकांनाही बेरोजगारी, महागाई, नागरी सुविधांचा अभाव, इंधन दरवाढ, मोदींची फसलेली आश्वासने याचा नक्कीच विसर पडला असेल. समस्यांचे हे रडगाणे रोजचेच आहे. त्यातून आजवर कधीही सामान्यांची सुटका झालेली नाही. यापुढेही होण्याची शक्यता नाही. मग हेच रडगाणे सतत गात बसायचे की, भारतीय पंतप्रधानांच्या अमेरिकेतल्या दिमाखदार “ग्रेटेस्ट शो-मनशीप’वर मनोमन खूश व्हायचे हे ज्याचे त्याने आपापल्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार ठरवायचे आहे.
अमेरिकेसारख्या महाशक्तिशाली देशात भारत वेगाने हागणदारी मुक्त होत आहे, येथील लोकांना आता गॅस कनेक्शन त्वरित मिळत आहेत, शाळा-शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधली जात आहेत, लोकांची बॅंकेत आता मोठ्या प्रमाणावर खाती उघडली जात आहेत, असे सांगणे हे नामुष्कीजनक आहे, असे कोणी म्हणतील. पण अशा लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. मोदींच्या कालच्या भाषणात असे काही गैरलागू मुद्दे असतीलही; तसेच त्यांचे अनेक दावे तद्दन खोटे होते असे दाखलेही काही जण देतील. विशेषत: एकाच पक्षाचे स्पष्ट बहुमतात सलग दुसऱ्यांदा सरकार निवडून येणे, हा चमत्कार आम्ही भारतात गेल्या 60 वर्षांत प्रथमच घडवला आहे, हा त्यांचा दावा तद्दन खोटा आहे याकडेही काही जण लक्ष वेधतील.
भारताचा सध्याचा जीडीपी जेमतेम 5 टक्क्यांवर आला असतानाही भारत 7.5 टक्के दराने प्रगती करीत आहे, हा दावाही खोटा असल्याकडे कोणी लक्ष वेधेल. पण असल्या क्षुल्लक खुसपटींना महत्त्व देण्याची अजिबात गरज नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपुढे भारताची रडकथा ऐकवण्याऐवजी भारतात “एव्हरीथिंग ईज फाईन,’ असे छातीठोकपणे सांगणारा धाडसी पंतप्रधानच आम्हाला अधिक पसंत आहे, असे जर बहुसंख्य लोकांचे म्हणणे असेल तर तिथे कोणाचेच डोके काम करीत नसते.