नाना पटोले यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या पदोन्नतीवरही शरसंधान
मुंबई : 2017मध्ये पोलिस मुख्यालयातून परिपत्रक काढल्यानंतर पोलिसांचे पगार ऍक्सिस बॅंकेतून होऊ लागले, असा आरोप करून बॅकेच्या अधिकारी ते व्हाईस प्रेसिडेंट अशी अमृता फडणवीस यांची प्रगती कशी झाली? असा बोचरा सवाल नाना पटोले यांनी केला.
ऍक्सिस बॅंकेत पोलिसांचे पगार काढण्याचा निर्णय घेऊन पदाचा दुरुपयोग केला हा आरोप खोटा आहे. पोलिस पगारांबाबतचा जीआर 2005 साली काढला असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यावर पटोले यांनी कडाडून हल्ला चढवला. फडणवीस यांच्याएवढा खोटा मुख्यमंत्री राज्याने पाहिला नव्हता असा हल्लाबोल त्यांनी केला.
2005 साली 15 बॅंकांचा जीआर काढला होता मात्र 2017 साली पोलीस मुख्यालयातून एक परिपत्रक काढण्यात आलं आणि पोलीसांचे पगार ऍक्सिस बॅंकेतून करण्याचा निर्णय झाला. विलासराव देशमुखांनी 2005 साली 15 बॅंकांचे परिपत्रक काढले त्यांच्या पत्नी कुठल्या बॅंकेत नव्हत्या. हे परिपत्रक काढलं तेव्हा अमृता फडणवीस या ऍक्सिस बॅंकेत होत्या असेही पटोले म्हणाले.
पाच वर्षात अमृता फडणवीस यांची बॅंकेच्या उपाध्यक्षपदी बढती कशी झाली ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. सत्तेचा दुरुपयोग केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असेही पटोले यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाला यात गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने त्यांनी ही जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतल्याचेही त्यांनी म्हटले. उच्च न्यायालय हे स्वत: करते म्हणजे यात गडबड झाली आहे असेही ते म्हणाले.