भारतीय गुंतवणूकदार पारंपारिकरित्या बँका, नावजलेल्या कंपन्या, सरकारी कंपन्या अशा अनेक ठिकाणी विविध मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करत आलेला आहे. या मुदत/बचत ठेवींमधून मिळणारा निश्चित परतावा हे मुख्य आकर्षण गुतंवणूदारांना असते. निश्चित कालावधीमध्ये मिळणारा निश्चित परतावा हा या गुंतवणूक पर्यायाकडे वळण्यास खुणावत असतो. बहुतांशी गुंतवणूकदार या मुदतठेवी अत्यंत सुरक्षित व उत्तम पर्याय मानत आलेले आहेत. यामुळेच अशा ठेवींकडे गुंतवणूकदार कायमच आकर्षित होताना दिसतो.
मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करत असताना पुढील काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करायला हवा.
मुदत ठेवींचे व्याजदर
मुदत ठेवींवर मिळणारे व्याज गेल्या वीस वर्षात सोळा टक्केवरून जवळपास सहा टक्के दरापर्यंत खाली आले आहे. (याठिकाणी सरकारी बँकांच्या ठेवींवरील व्याजदर गृहित धरले आहेत.) सध्या या ठेवींवर मिळणारे व्याज हे महागाई दराएवढेच मिळत आहे. यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराची क्रयशक्ती (पर्चेसिंग पॉवर) नष्ट होत आहे. उदाहरणार्थ जर आज एका वस्तूला खरेदी करण्यासाठी रू. १०० द्यावे लागत असतील तर हीच वस्तू पुढील वर्षी १०६ दराने उपलब्ध असणार आहे. (महागाई दर सहा टक्के गृहित धरला आहे.) सध्या गुंतवणुकीवर जर ६ टक्केच व्याज मिळत असेल तर आज गुंतवलेले रू. १०० पुढील वर्षी रू. १०६ होणार आहेत. म्हणजेच गुंतवणुकदाराने गुंतवणुकीमधून कोणतीही कमाई केलेली नसणार. याचाच अर्थ मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराचे केवळ मुद्दल सुरक्षित राहिले परंतु त्यांना प्रत्यक्षात कोणताही परतावा मिळालेला नाही असा त्याचा अर्थ होतो.
मुदत ठेव की म्युच्युअल फंडांच्या योजना? (भाग-2)
बँकांचे व्यवस्थापन, खासगी कंपन्यांचे व्यवस्थापन
जर आपणास पतसंस्था किंवा सहकारी बँका, खासगी संस्था जादाचे व्याजदर देत असतील तर गुंतवणुकदारांनी सावधपणे गुंतवणुकीचा विचार करावा. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक पतसंस्था, सहकारी बँका व खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांचे व्याज व मुद्दल दोन्हीही धोक्यात आले आहे. अनेक सहकारी बँका, खासगी वित्त संस्थांचा एनपीए (दिलेल्या कर्जांची परतफेड न होण्याचे प्रमाण) सातत्याने वाढत आहे. यामुळे गुंतवणूकदाराच्या गुंतवलेल्या मुद्दलाबाबतच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुद्दलाबाबत निर्माण होणारा धोका हा वाढीव व्याजदरापेक्षा फार मोठा आहे. अनेक गुंतवणूकदार आपली ठेव सुरक्षित आहे असे मानतात कारण याला विमा संरक्षण असते असे समजले जाते. रू. १,००,००० च्या बँकेतील ठेवींवर विमा संरक्षण दिले जाते. याचाच अर्थ उर्वरित रक्कम कोणत्याही संरक्षणाविना गुंतवलेली असते.