Mutual Funds| गेल्या काही वर्षापासून म्युच्युअल फंड उद्योग झपाट्याने विकसित होत आहे. या उद्योगाच्या अंतर्गत असलेल्या मालमत्ता व्यवस्थापनात महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. त्याचबरोबर इतर अनेक छोटी राज्य या क्षेत्रात आगेकूच करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र, नवी दिल्ली, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्याचा म्युच्युअल फंडाकडील मालमत्तात 69 टक्क्याचा वाटा आहे. ही माहिती जानेवारी 2024 पर्यंत संकलित केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. ईक्रा या कंपनीने ही माहीती संकलित केली आहे. फंडाकडे जी रक्कम जमा होते त्यामध्ये या पाच राज्याचा वाटा वार्षिक पातळीवर 27 ते 30 टक्क्यांनी वाढत आहे असे सांगण्यात आले. म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखाली तब्बल 52.89 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 21.69 लाख कोटी, दिल्लीचा वाटा 4.52 लाख कोटी, कर्नाटकचा वाटा 3.65 लाख कोटी, गुजरातचा वाटा 3.61 लाख कोटी आणि पश्चिम बंगालचा वाटा 2.74 लाख कोटी आहे. यावरून या क्षेत्रात महाराष्ट्र किती पुढारलेला आहे याची कल्पना येते. अर्थात मुंबई शहरातून यासाठी सर्वात जास्त योगदान असल्यामुळे महाराष्ट्राची आकडेवारी जास्त आकर्षक असल्याचे दिसून येते.
तामिळनाडूचा वाटा 2.41 लाख कोटी, उत्तर प्रदेशाचा वाटा 2.42 लाख कोटी, राजस्थानचा वाटा 96,619 कोटी, मध्य प्रदेशाचा वाटा 81,388 कोटी, तर तेलंगणाचा वाटा 78,964 कोटी रुपयाचा आहे. तेलंगणा, नवी दिल्ली ही राज्य तुलनेने छोटे आहेत. मात्र या राज्यातील जनता म्युच्युअल फंडाकडे अधिक आकर्षित झाली असल्याचे दिसून येते. 10 राज्याचा म्युच्युअल फंडातील वाटा तब्बल 87% इतका आहे. यावरून इतर काही राज्य किती पिछाडीवर आहेत याचीही कल्पना येते.
पांडेचरीचा वाटात 3,193 कोटी, त्रिपुराचा वाटा 2,053 कोटी, सिक्कीमचा वाटा 1,780 कोटी, मणिपूरचा वाटा 3,726 कोटी रुपये आणि लक्षद्वीपचा वाटा 169 कोटी रुपयाचा आहे. या संस्थेने म्हटले आहे की, म्युच्युअल फंड कंपन्यांनी देशातील मोठ्या शहरातच आपले काम सुरू केले होते. मात्र आता इंटरनेटमुळे आणि डिमॅट अकाउंट मुळे छोट्या शहरातही अशी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे छोट्या शहरातून म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.
महाराष्ट्रात म्युच्युअल फंडांच्या कंपन्याची 246 कार्यालय आहेत तर मणिपूर मध्ये फक्त एक कार्यालय आहे. मात्र इंटरनेटमुळे मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड उद्योगाने आकर्षक जाहिरात मोहीम गेल्या दहा वर्षापासून राबविली आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे. अशा परिस्थितीत बँकातील ठेवी कमी होत आहेत. ही चिंतेची बाब समजली जाते. त्यामुळे आता बँका ठेवी आकर्षित करण्यासाठी आक्रमक उपाययोजना करीत असल्याचे वातावरण आहे.