नवी दिल्ली – मोदी सरकारचा या शंभर दिवसांचा कार्यकाल म्हणजे गोंधळ, अराजक आणि दुर्देवी कारभाराचाच काळ होता. सरकार अनेक बाबतीत दिशाहिन होत असून माध्यमांवरील आपली पकड अधिक मजबूत करून सरकारने आपल्यावरील टीका दाबून टाकली आहे. देशात आर्थिक अनागोंदी निर्माण झाली असून आठ महत्वाच्या क्षेत्रातील विकास दर दोन टक्क्यांच्याही खाली आला आहे अशा शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकाच्या कामावर टीका केली आहे.
मोदी सरकारला शंभर दिवस पुर्ण होत असल्याच्या संबंधात ट्विटर अकौंटवरून त्यांनी हीं प्रतिक्रीया दिली आहे. कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनीही पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकालाची पोलखोल केली.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की शंभर दिवसात कसलाच विकास झाला नाही. उलट लोकशाहीं तत्वांची शक्य तितकी पायमल्ली करण्यात आली. प्रसार माध्यमांवरील पकड मजबूत करून सरकारच्या विरोधातील टीका दाबून टाकण्यात आली. देशाच्या खराब अर्थव्यवस्थेकडे लक्ष देणे आवश्यक असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आली अशी टीकाहीं यानिमीत्ताने करण्यात आली आहे. आपली अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जात असताना अर्थमंत्र्यांनी मात्र ते मान्य केलेले नाही.
उलट भारताचे अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीनपेक्षाहीं चांगली कामगीरी करीत आहे असे त्या म्हणत आहेत. कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे की सरकारने संसदेत 38 विधेयके संमत केली त्यापैकी 28 विधेयके छाननी न करताच आणि चर्चेला पुर्ण वाव न देताच संमत करण्यात आली. या शंभर दिवसांत भाजपशी संबंधीत दोषी लोकांना मोकळे सोडून विरोधकांनाच लक्ष्य करण्याची सरकारने चांगली कामगिरी केली आहे अशी उपरोधिक टिपण्णीही त्यांनी केली.