सम्राट गायकवाड
गोरेंच्या पक्षांतराने राजकीय समीकरणे बदलणार
राष्ट्रवादीची सत्तास्थाने भविष्यात धोक्यात?
पाच मतदारसंघांवर परिणाम
जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशामुळे माण-खटावसह, कोरेगाव, फलटण, कराड-उत्तर आणि वाई विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे. मात्र, त्यामध्ये देखील गोरे यांनी आपल्या विचाराचे सहकाऱ्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली असल्याची माहिती पुढे येत आहे. त्या मागणीवर पक्षाकडून सर्वेक्षण सुरू असून त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे.
सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात बॅकफुटवर गेलेली कॉंग्रेस जयकुमार गोरे यांच्या निमित्ताने नावारूपास येण्यास सुरूवात झाली होती. मात्र, आता खुद्द जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेस वाढीची अखेरची शक्यता मावळली आहे. दरम्यान, गोरेंच्या पक्षांतरामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलणार असून येत्या काळात राष्ट्रवादीची सत्तास्थाने धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दुष्काळी माण-खटावच्या पारंपरिक राजकारणाला छेद देत जयकुमार गोरे यांनी 2007 साली कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारर्किदीला सुरूवात केली. स्व.पंतगराव कदम यांच्या पुढाकाराने तत्कालिन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत गोरे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला व पुढे जिल्हापरिषदेची निवडणूक लढवून जिंकली. सुरूवातीचे दोन वर्ष गोरे यांनी जिल्हा परिषद चांगलीच गाजवली अन अल्पावधीत गोरेंची लोकप्रियता विशेषत: जिल्ह्याच्या पूर्वभागात वाढण्यास सुरूवात झाली.
परिणामी 2009 च्या माण-खटाव विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत त्यांनी किंगमेकर स्व.सदाशिवराव पोळ यांचा पराभव केला व विधानसभेत एंट्री केली. 2011 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आदर्श घोटाळ्याचा आरोप झाल्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. एवढेच नव्हे तर केंद्रात देखील कॉंग्रेसच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार आरोपांचे सत्रच सुरू होते. अशावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी स्वच्छ चारित्र्याचा चेहरा देण्यासाठी तत्कालिन केंद्रीय मंत्री व जिल्ह्याचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
त्यावेळी चव्हाण यांना विधानसभा अथवा विधानपरिषदेचे सदस्य होणे कायद्याने बंधनकारक असल्याने गोरे यांनी चव्हाण यांच्यासाठी पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आपसुकच गोरे यांचे नाव राज्यात तसेच कॉंग्रेस श्रेष्ठींपर्यंत झपाट्याने पोहचले. असे असले तरी चव्हाण यांनी विधानसभेऐवजी विधानपरिषदेच्या माध्यमातून सदस्य होण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे गोरे हे आमदार म्हणून पुढे कार्यरत राहिलेच व त्याचबरोबर चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मोठा लाभ माण-खटाव विधानसभा मतदारसंघासाठी झाला. दहिवडी येथे प्रशासकीय इमारत, विद्यार्थी वसतिगृहांना मंजूरी मिळून झपाट्याने भूमीपूजन ही झाले. तसेच बंधाऱ्यांची कामे देखील मोठ्या प्रमाणात झाली. उरमोडी धरणाचे पाणी माणमध्ये पोहचण्याचा मार्ग देखील चव्हाण यांच्यामुळे मोकळा झाला.
2014 मध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. साहजिकच आघाडीच्या जागा वाटपात माण-खटावची जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली. गोरे कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. मात्र, तरी देखील त्यांचा संघर्ष भाजप-शिवसेना नव्हे तर राष्ट्रवादीशी सुरू होता. पुढे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत देखील गोरे यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीने सर्वोतपरी प्रयत्न केले. मात्र, सर्व प्रसंगावर मात करत गोरे त्या निवडणुकीत विजयी झाले अन त्यांनी राष्ट्रवादीच्या सत्तास्थानामध्ये शिरकाव केला.
पुढे बॅंकेच्या धोरणांच्याविरोधात वेळोवळी आवाज उठविला. त्याचबरोबर बॅंकेच्या समोर काही दिवस आमरण उपोषण देखील केले. सर्व प्रसंगामध्ये स्व.पतंगराव कदम यांची त्यांना साथ कायम होती. मात्र, त्यानंतर कदम यांचे निधन झाले अन् गोरे यांचा गॉडफादर हिरावला गेला. कॉंग्रेसमध्ये गोरे एकाकी पडले. मात्र, तरी देखील त्यांनी न डगमगता एकाच वेळी स्वकीय आणि परकियांशी लढा सुरू ठेवला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र, त्यांनी ती कधी बोलून दाखविली नाही अन पक्षाने ही त्या दृष्टीने दखल घेतली नाही. अखेर गोरे यांनी त्यांचे मित्र रणजितसिंह ना.निंबाळकर यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळवून दिली.
परंतु पुढे काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. कोणत्याही परिस्थितीत माढा लोकसभेला राष्ट्रवादीचा पराभव करायचा ह्या इराद्याने गोरे यांनी संपुर्ण मतदारसंघातील दिग्गज नेत्यांची मोट बांधली. मात्र, त्यामधीलच संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली. परिणामी गोरे यांनी ना. सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून निंबाळकर यांचा भाजप प्रवेश घडवून पुढे खासदारकीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
साहजिकच निंबाळकर भाजपमध्ये गेल्यानंतर गोरे देखील पक्षांतर करणार, अशा चर्चांना सुरूवात झाली. मात्र, गोरे यांनी अचूक टायिंमग साधत जिहे-कठापूर योजनेमध्ये माण तालुक्यातील वंचित गावांचा समावेश करून घेतला व निधीची तरतूद देखील करून घेतली. त्यानंतरच त्यांनी रविवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गोरेंच्या प्रवेशामुळे त्यांचे समर्थक वगळता सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे. कारण, गोरे यांना सर्वच पक्षामधून विरोध आहे. मात्र, तरी देखील केंद्रातील दिग्गज मंत्र्यांनीच प्रवेश दिल्यामुळे विरोध करणारे विशेषत: भाजप नेते चडीचूप झाले आहेत.
सद्यस्थितीत देशातील राजकीय परिस्थिती पाहता गोरे यांना आगामी निवडणूक फारशी जड जाईल, असे सांगण्यास कोणी ही धाडस करणार नाही. मात्र, निवडणुकीत भाजप-सेनेची युती तुटली तर गोरे यांना संघर्ष करावा लागणार आहे. कारण, अगोदरच शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेखर गोरे वगळता मतदारसंघात कोणताही नेता जयकुमार गोरे यांच्याशी सर्व पातळीवर लढत देवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
गोरे बंधुमध्ये लढत होवून पुन्हा एकदा जयकुमार गोरे विजयी झाले तर विशेषत: राष्ट्रवादीच्या गोटात धमाका होणार हे नक्की आहे. कारण, आगामी जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत स्वतंत्र पॅनेल टाकण्याची घोषणा गोरे यांनी या अगोदरच केली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे बहुमत असले तरी सद्यस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा होत असलेला भाजप प्रवेश पाहता आगामी काळात जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल व त्याची सर्व जबाबदारी गोरे यांच्यावर सोपविली जावू शकते.