शिवसेनेच्या अरविंद सावंत यांची मागणी
मुंबई : देशभरात आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. कारण काही जणांनी याचे स्वागत केले आहे तर काहींनी याचा तीव्र विरोध केला आहे. त्यातच महाराष्ट्रातही अशी पद्धत अवलंबावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
आसामच्या धर्तीवर मुंबईतही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी केली आहे. आसाममधील मूळ रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी एनआरसीच्या अंमलबजावणीची आवश्यक होती. बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेकडून मांडण्यात आला होता, त्यामुळे आसाममधील एनआरसीला आम्ही पाठिंबा दिला होता. याच धर्तीवर आता मुंबईमधील नोंदणी करण्यात यावी, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. आसाममधील एनआरसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील अवैध बांगलादेशींचा प्रश्नही सोडवायला हवा, त्यासाठी येथेही एनआरसीची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी सावंत यांनी केली. याशिवाय, आसामप्रमाणेच दिल्ली शहरातही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी दिल्ली भाजपप्रमुख मनोज तिवारी यांनी केली असून या संदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचेही म्हटले आहे.