जि.प. स्थायीच्या सदस्यपद प्रकरणात राष्ट्रवादी, कॉंग्रेसची राजकीय खेळी
पुणे – राज्यात लोकसभा निवडणुकीपासून कॉंग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीच्या निवडणुकीत तंतोतत पालन केले. त्यानंतर बावडा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांना राष्ट्रवादीने पाठिंबा देत मदत केली. त्यावेळी आघाडीची चर्चा जोर धरू लागली. इंदापूरात आघाडीचा एकोपा शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यात दिसून आला. इंदापूरच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, दोन महिन्यांपासून पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे जाहीर कार्यक्रमात आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे आघाडीचा गुंता आणखी वाढला आहे.
त्यातच पाटील यांचे विधानगाथा पुस्तक प्रकाशन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झाल्याने तसेच अन्य काही घटनांतून पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. याच करणातून याचे राजकीय पडसाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. स्थायी समितीच्या सदस्यपदी अंकिता पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे अंकिता पाटील यांचा पत्ता कट केला, त्यामुळे पाटील यांना होम ग्राऊंडवरच बॅकफूटवर यावे लागले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
घडलयं… बिघडलयं…
बावडा जि. प. सदस्या रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांनी विक्रमी मतांनी विजयी झाल्या. लोकसभेला पाटलांनी केलेली मदत पोटनिवडणुकीत कामी आली. राष्ट्रवादीने आघाडी धर्माचे पालन करीत अंकिता पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे पाटील-भरणे एकत्र येणार, अशी चिन्हे होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य पदासाठी अंकिता पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला. याला भाजप प्रवेशाचे कारण दिले जात आहे.
कॉंग्रेसमध्ये दुफळी;
जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे नऊ सदस्य असून त्यापैकी सात सदस्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. मात्र, इंदापूरविरुद्ध पुरंदर असे नाट्यमय संघर्ष पहिल्यांदाच पाहायला मिळाला. भोर-वेल्हामधील कॉंग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे कॉंग्रेसमधील तीन गटांची विचारसरणी अधोरेखित झाली आहे. दरम्यान, पाटील भाजपच्या वाटेवर असल्याने अंकिता यांना स्थायी समिती सदस्य कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवड लांबणीवर टाकली आहे.
कॉंग्रेसमध्ये पत राहिली नाही…
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतर चर्चेमुळे जिल्हा परिषदेच्या सभेत पडसाद उमटले होते, त्यामुळे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे सक्रिय झाले. ते पुरंदरसाठी आग्रही राहिले. अंकिता पाटील यांना डावलून जगताप यांना झुकते माप दिले गेले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्र देऊनही अंकिता पाटील यांना डावलण्यात आल्याने हर्षवर्धन पाटील कमालीचे नाराज असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाला बळ मिळाले आहे.