रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर: शासनाने घरोघरी गॅस पोहचविला असून आता केरोसीन पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यापूर्वी शहरातील केरोसिन पुरवठा बंद झाला. त्यानंतर नीमशहरी गावांचा आणि आता छोट्या वाडया वस्त्यांचा बंद करण्यात आला आहे. परंतु केरोसिन पुरवठा बंद झाल्याने गरिब ग्राहक व परप्रांतीय ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याची परिस्थिती आहे .
खेड तालुक्यात १८६ स्वस्त धान्य दुकानदारांना ३६ हजार लीटर केरोसीनचा पुरवठा शासनामार्फत होत होता. १ ऑगस्ट पासून तो बंद करण्यात आला आहे. वीज गेल्यावर एैन वेळचा कंदील व बत्तीचा पर्याय अजूनही ग्रामीण भागात वापरला जातो. गॅस संपल्यावर महिला चुल पेटवतात. परप्रांतीयांना गॅस मिळत नसल्याने ते स्टोव्ह वापरतात. त्यासाठी केरोसीन लागते. ग्रामीण भागात अजूनही घरोघरी गॅस पोहचला नाही. आदिवासी भागात तो संपल्यावर लगेच मिळण्याची खात्री नाही. या सर्वावर पर्याय म्हणून केरोसीनचा आधार ग्रामीण जनतेला वाटतो. आता ते मिळत नसल्याने त्यांचे हाल सुरू झाले आहे. ग्रामीण भागात केरोसीन विक्री पुन्हा सुरू करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्वस्त केरोसीन गरिबांना मिळायला हवे
केरोसिन वितरक भास्कर जगदाळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात दशक्रिया घाटावर, पावसाळ्यात चुलीसाठी, गॅरेजमध्ये गाडयांचे व सायकलींचे पार्ट धुण्यासाठी केरोसिन गरजेचे आहे. डिझेल हा त्याला पर्याय आहे परंतु ते फार महाग पडते. स्वस्त केरोसीन गरिबांना मिळायला हवे.
शासनाकडूनच सगळीकडचा पुरवठा बंद
पुरवठा विभाग अव्वल कारकून डी .एन. मडके यांनी सांगितले की, ग्रामीण भागातून केरोसीनची मागणी असली तरी शासनाकडूनच सगळीकडचा पुरiवठा बंद करण्यात आला आहे. शासनाकडून सर्वांना गॅस पुरविण्यात आले आहे .केरोसीन बंद हा शासनाचा निर्णय आहे आमच्या हातात काही नाही