पिंपरी – केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात हगणदारी मुक्त शहराचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. राज्य सरकारचे पथक शहराची पाहणी करीत आहे. त्यानंतर हागणदारीमुक्तशहराचे मानांकन ठरणार आहे.
हागणदारी मुक्त शहरासाठी दर सहा महिन्याला सर्वेक्षण करण्यात येते. स्वच्छ भारत अभियानात शहराची पिछाडी झाल्याने मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. मानांकन वाढावे, यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात बुधवारपासून सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षण करणारे पथक दाखल झाले आहे. पथकातील अधिकारी हे अचानकपणे घटनास्थळी येत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभाग, आणि प्रभाग अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.