पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जंतामुळे बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुला-मुलींमध्ये अॅनिमियासह पोटाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर वर्षातून दोनवेळा जंतनाशक गोळी देण्याची विशेष मोहीम राज्याच्या आरोग्य विभागाकडून राबविली जाते. त्यानुसार दि. १३ फेब्रुवारीला १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच या दिवशी ज्या मुलांना गोळी घेता आली नाही, त्यांना 20 फेब्रुवारील गोळी देण्यात येईल.
जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये अॅनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजारांचा धोका असतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना ही गोळी देणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात. तर अत्यावश्यक रुग्णवाहिका सेवेसाठी टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करा.
वयोगट आणि गोळी देण्याची पद्धत
१ ते २ वर्षे : २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी पावडर करून पाण्यातून
२ ते ६ वर्षे : ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून पाण्यातून
६ ते १९ : मुला-मुलींना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास देण्यात येते