आळेफाटा – गणरायाच्या आगमनासाठी जुन्नर तालुक्यात लगबग सुरू झाली आहे. सोमवारी (दि. 2) गणरायाची स्थापना होणार असल्यामुळे गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांची सध्या जोरदार धावपळ चालू आहे. यावर्षी डायमंड डिझायनचा ट्रेंड असल्यामुळे या प्रकारच्या श्री गणेशाच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये पेण येथील गणेश मूर्तीप्रमाणे मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांचा ओढा जास्त आहे. कलाकार मंडळी आपल्या कारखान्यात मूर्ती तयार करण्याची सुरुवात चार महिन्याने आधीपासूनच करतात. ग्रामीण भागात प्रामुख्याने नव्वद टक्के प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जातात आणि दहा टक्के मूर्ती शाडू मातीच्या केल्या जातात.
सध्या मुंबईप्रमाणे ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांचासुद्धा मोठ्या मूर्ती घेण्याकडे कल वाढू लागला आहे मात्र, यामुळे प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे, तसेच ग्रामीण भागातील नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना तो पर्यावरण पूरक करावा, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञांकडून होत आहे. सध्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेला बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीमालाला आणि दुधाला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, गणपती बाप्पावर असलेली श्रद्धा आणि निष्ठा यामुळे बळीराजा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची शक्यता आहे.
संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये दर्जेदार कलात्मक गणेश मूर्ती सर्व मंडळे घेऊन जातात. आत्तापर्यंत 90 टक्के मूर्तींचे बुकिंग झाले आहे. यावर्षी डायमंड डिझाईनचा ट्रेण्ड असल्यामुळे या गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यावर्षी मूर्तींच्या किमतीत मागील वर्षापेक्षा 10 टक्के वाढ झाली आहे.
– गणेश शिवाजी भालेराव, गणेश मूर्तीकार, पारुंडे
अलीकडच्या काळात ग्रामीण भागातसुध्दा प्रदूषणाची पातळी वाढत आहे. धार्मिक सण साजरे करताना पर्यावरणपूरक केले जावेत, यासाठी सरकारने कडक नियम करावेत. गणरायाच्या विसर्जनानंतर अनेक ठिकाणी नदीची अवस्था अत्यंत दयनीय होते, यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.
– राजकुमार डोंगरे, पर्यावरण तज्ज्ञ, खोडद