प्रशासनाकडून दुर्लक्ष : 60 वर्षांपासून वहिवाटीचा रस्ता
सातारा – मालगाव, ता. सातारा येथील शिवारातील गट नं. 163, 164 मधून शेतकऱ्यांच्या वापरात असलेला रस्ता गेल्या दोन वर्षांपासून राजकारणाच्या कारणातून अडवण्यात आल्याने या रस्त्याचा वापर करुन शेती करणाऱ्या 45 शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. आता तर या रस्त्यावर जेसीबीने खोदून मोठा चर काढल्याने येथील वहिवाट बेकायदेशीरपणे बंद केली असून याबाबत तातडीने मार्ग काढून संबंधित रस्ता खुला करुन देण्याची मागणी दादासाहेब जगन्नाथ कदम, भास्कर गणपत कांबळे यांच्यासह 45 शेतकऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात तक्रारदार शेतकऱ्यांतर्फे इंडिया व्हिजन संस्थेचे पंकज कुंभार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. यासंदर्भात पूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह पोलीस ठाण्यात तक्रारी होवून देखील या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्यास ऊस देखील घालता आलेला नसल्याने नुकसान झाले असून आता या रस्त्यात काही दिवसांपूर्वी जेसीबीने चर खोदून व ताल धरुन हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला यामुळे गावातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना शेती कसता येत नसल्याचे दादासाहेब कदम व भास्कर कांबळे यांनी सांगितले.
हिरालाल निवृत्ती कदम, शैलेश नानासो कदम, वैभव उत्तम कदम व इतरांनी गट क्रमांक 163, 164 व 165 मधून जाणारा रस्ता अडवल्याने गेल्या 60 ते 65 वर्षांपासून सुरु असलेली वहिवाट थांबली आहे. रस्ता नसल्याने शेती कशी कसायची असा सवाल या 45 शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पाहणी करण्यात आली मात्र महसूल विभागाचे तलाठी, मंडलाधिकाऱ्यांनी काहीही अहवाल पाठवले नाहीत.
वास्तविक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये कलम 143 नुसार भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा तसेच बेकायदापणे अडवलेला रस्ता खुला करुन देण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. त्यांना देखील निवेदन देण्यात आले असून आता प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेवून आम्हाला आमची शेती कसण्यासाठी रस्ता सुरु करुन द्यावा, अशी मागणी कदम, कांबळे तसेच इंडिया व्हिजन संस्थेचे प्रमुख पकंज कुंभार यांनी केली आहे.