परतीच्या प्रवासालाही टोलमाफी
मुंबई: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफी देण्यात आली असून त्यासाठी देण्यात येणारे स्टिकर्स 30 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. गणेशभक्तांनी जवळचे पोलीस ठाणे अथवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन स्टिकर्स घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. विशेष म्हणजे ही टोलमाफी परतीच्या प्रवासालाही लागू राहणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या असते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे टोलनाक्यावर वाहतूक कोंडी होते. या कोंडीतून सुटका करण्यासाठी यंदाही गणेशभक्तांना टोलमाफी देण्यात आली आहे. गणेशभक्तांसाठी पथकर माफीच्या निर्णयाबाबत अंमलबजावणी करण्याकरिता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली.
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही विशेष सवलत गणेशोत्सवासाठी जाताना आणि परतीच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे टोलमाफीच्या सवलतीसाठी स्टिकर्सचा नमुना तयार करण्यात आला असून त्यावर संबंधित वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आदी माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये देण्यात यावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी समन्वय साधून हे स्टिकर्स उपलब्ध करुन देतील.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबई-पुणे प्रवासात पुणे ते कोल्हापूर-कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुंबई (वाशी), पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, किणी तासवडे, मुंबई प्रवेशद्वार, खेड-विसापूर येथील पथकर नाक्यांवर पथकरातून वाहनांना सवलत देण्यात येणार आहे. या काळात पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अधिकचे मनुष्यबळ, ट्रॅफीक वार्डन, हॅंड होल्डींग मशिन ठेवण्याचे आदेशही शिंदे यांनी यावेळी दिले.