कम्युनिटी रेडिओसाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण नवी दिल्ली: कलम 370 रद्द करण्याचा निर्णय स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, शिक्षण हक्कासारखे कायदे, आरक्षणाचे फायदे त्यांना मिळावेत, यासाठी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 2014 ते 2019 या काळात भारतीय अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावरुन 5 व्या स्थानावर पोहोचली. भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, ती तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याचे उद्दिष्ट आता असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
देशात कम्युनिटी रेडिओ चळवळीला अधिक चालना देण्यासाठी कम्युनिटी रेडिओ केंद्रांची संख्या 262 वरुन 500 वर वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, असे जावडेकर यांनी आज सांगितले. रेडिओ हे संवादाचे अत्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह माध्यम आहे. “मन की बात’ आता “देश की बात’ आणि प्रत्येकाच्या “दिल की बात’ झाली असल्याचे ते म्हणाले. या संदर्भातील आपले अनुभव, सूचना पाठवण्याचे आवाहन त्यांनी केंद्रांना केले.
नवी दिल्लीतल्या डॉ. बी.आर.आंबेडकर भवनात झालेल्या कार्यक्रमात जावडेकर यांच्या हस्ते आज कम्युनिटी रेडिओसाठीचे वर्ष 2018 व 19चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या 75 दिवसात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवरील “जनकनेक्ट: सही नियत मजबूत फैसले’ या पुस्तिकेचे प्रकाशनही जावडेकर यांच्या हस्ते झाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या “ब्यूरो ऑफ आऊटरिच ऍण्ड कम्युनिकेशन’ने ही पुस्तिका तयार केली आहे.
विषय, लोकांसोबत काम, स्थानिक संस्कृतीला चालना, सर्वाधिक सृजनशील / नाविन्यपूर्ण आणि शाश्वतता अशा पाच वर्गवारीत वर्ष 2018 आणि 19 साठी हे पुरस्कार देण्यात आले.
जावडेकर यांनी देशभरातली कम्युनिटी रेडिओ केंद्र करत असलेल्या कामाचे कौतुक केले.देशभरातल्या कम्युनिटी रेडिओ केंद्रांवर चालणाऱ्या कार्यक्रमांचे संकलन असलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले. माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी शाश्वत विकास उद्दिष्टे आणि कम्युनिटी रेडिओ यावर आपले विचार मांडले.