जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये जिवीतहानी टाळण्यासाठीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत, असे जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र इंटरनेटचा वापर देशविरोधी घटकांकडून केला जात असल्यामुळे इंटरनेट प्रणालीवरील निर्बंध आणखी काही काळासाठी वाढवण्यात येणार आहेत, असेही राज्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.
जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा 5 ऑगस्ट रोजी हटवल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
काश्मीर खोऱ्यातील निदर्शकांच्या विरोधात सुरक्षा रक्षकांकडून पॅलेट गनचा वापर करण्यात आला, ही बाब त्यांनी मान्य केली. गंभीर दुखापत टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून अतिरिक्त खबरदारी बाळगण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये आगामी 3 महिन्यांच्या कालावधीत 50 हजार रोजगार उपलब्ध होतील. हा जम्मू काश्मीरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा रोजगार असेल, असेही ते म्हणाले. केंद्र सरकार लवकरच जम्मू आणि काश्मीरबाबत मोठी घोषणा करणार असल्याचेही राज्यपाल मलिक यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील स्थानबद्ध केलेल्या राजकीय नेत्यांबाबत वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. या नेत्यांना स्थानबद्ध केल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मदतच होणार आहे, असेही ते म्हणाले.