शिवसेनेने सरकारच्या योजनांवर ओढले ताशेरे
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. अर्थमंत्र्यांनी अत्यंत धाडसाने सत्य सांगितले आहे. लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर आहे. या संस्थेने नोटाबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. दरम्यान, सामनाच्या अग्रेलेखातून शिवसेनेने केंद्र सरकारवरच्या अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहे. यात बिहारमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. 21 तोफांची सलामी देण्याचा रिवाज त्यात आहे. पण सलामीस वर केलेल्या पोलिसांच्या बंदुकांतून एकही गोळी सुटली नाही. 21 बंदुकांचा चाप दाबून पोलिसांची बोटे सुजली. आमची अर्थव्यवस्था त्या फसलेल्या तोफांच्या सलामीसारखीच झाली आहे. सीतारमण यांनी तेच सांगितले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय? ते लवकरच दिसेल, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवच टीका केली आहे
कलम 370 च्या निर्णयाचे एकीकडे शिवसेनेने स्वागत केले होते तर आता देशाच्या अर्थव्यवस्थेवरून सरकारला धारेवर धरले आहे. आर्थिक मंदी आणि भ्रष्ट्राचाराने देशात थैमान घातले आहे. त्यातच देशात बेरोजगारी निर्माण झाली आहे. मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटाबंदीच्या निर्णयात आहे, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा झाला. तसेच अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्याही गमावल्या. सीतारमण सांगतात तो भ्रष्टाचार नोटाबंदीनंतरचा, म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांतला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते, असेही यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या सरकारच्या कार्यकाळात परदेशातला काळा पैसा स्वदेशात आला नाही. उलट बॅंका बुडवणारे शंभरावर उद्योगपती देशातून पळून गेले. त्यांना सीबीआयने रोखले नाही व ईडीनेही आडकाठी केली नाही, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.