पुणे – कमाल तापमानात वाढ होत असतानाच शुक्रवारी सकाळापासून राज्यातील विविध भागांत पावसाची नोंद झाली. तर, दुसऱ्या बाजूला येत्या सोमवारपासून बरसेल मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर पावसाने विश्रांती घेतली होती, पण गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर मान्सूनचा आस हा कमी दाबाच्या पट्ट्याच्या पश्मिकडे सरकल्याने मध्य भारतात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण व हलक्या व मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.