धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू
रावणगाव – धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे म्हणून 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून धनगर समाज बांधव उपोषणास बसलेले आहेत. या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी रावणगाव (ता. दौंड) ग्रामस्थांच्या वतीने गावचे सर्व व्यवहार बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आला.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे; सरकारच्या नाकर्तेपणामुळे धनगर समाजाला आजूनही आरक्षण मिळालेले नाही, त्यामुळे समाजाच्या मागण्यांप्रमाणे आरक्षणाच्या लढ्याकरिता सरकार नियुक्त वकिलांची फौज तैनात करण्यात यावी, होणारा खर्च राज्य सरकारने उचलावा आणि धनगर समाजाला त्वरित अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत या मागण्यांकरिता गेल्या सहा दिवसांपासून धनगर समाजातील पांडुरंग मेरगळ, विजय तमणर, किशोर सूळ, राजेंद्र तागड, सुरेश होलगुंडे, नागोराव बारसे, गंगाप्रसाद खारोडे, माऊली हाळवणकर, प्रकाश थाडके आणि धनाजी बंडगर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी आज (दि. 14) रावणगाव ग्रामस्थांच्या वतीने गावाच्या मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.