चेन्नई – जम्मू-काश्मीरला राज्यघटनेतील कलम 370 द्वारे देण्यात आलेला विशेष दर्जा हटवल्यामुळे तेथील दहशतवाद संपुष्टात येईल आणि तेथील प्रगती होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. गृहमंत्री म्हणून आपणाला कलम 370 हटवल्यानंतरच्या परिणामांबाबत काहीही शंका वाटतच नव्हती, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एक डोळा दुसऱ्याला पाहू शकत नाही…
एका कम्युनिस्ट प्राध्यापकांनी विद्यार्थी असलेल्या नायडू यांना “जे राज्य बघितलेही नाही, त्याबाबत संघर्ष का करता?’ असा प्रश्न केल होता. त्यावर “एक डोळा दुसऱ्या डोळ्याला बघू शकत नाही. मात्र दुसऱ्या डोळ्याची वेदना जाणवतेच, असे उत्तर नायडू यांनी दिले होते, अशी आठवण अमित शहा यांनी सांगितली.
उपराष्ट्रपती एम. व्यैंकया नायडू यांच्या उपराष्ट्रपतीपदाला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लिहीलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. देशाला कलम 370चा काहीही उपयोग नव्हता. त्यामुळे ते कलम हटवले जायलाच पाहिजे होते. हे कलम यापूर्वीच हटवले जायला पाहिजे होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी आणि अमित शहा म्हणजे कृष्ण-अर्जुन
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी कलम 370 रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची तुलना त्यांनी थेट कृष्ण आणि अर्जुन यांच्याशी केली. “मिशन काश्मीर’बाबत मी गृहमंत्री अमित शहा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे दोघेही कृष्ण आणि अर्जुनासारखे आहेत. पण यांच्यातील कोण कृष्ण आणि कोण अर्जुन हे माहिती नाही, असेही रजनीकांत यांनी सांगितले. रजनीकांत यांनी तामिळनाडूत 2021 साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे निश्चित केले आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आता प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे. हे पाऊल उचलल्यामुळे काय होईल, याबाबत आपल्या मनामध्ये कोणताही संदेह नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारमुळेच कलम 370पासून देशाला मुक्ती मिळू शकली आहे, असे ते म्हणाले.
जेव्हा काश्मीरशी संबंधित विधेयक राज्यसभेमध्ये मांडले गेले, तेव्हा उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांनी अत्यंत कौशल्याने सभागृहाचे कामकाज हाताळले. राज्यसभेत सरकारला पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे आंध्रप्रदेशच्या विभाजनाच्यावेळी राज्यसभेत जी स्थिती निर्माण झाली होती, त्याचीच पुनरावृत्ती होणार का अशी आपल्याला भीती वाटायला लागली होती.
पण तरिही आपण लोकसभेच्या अगोदर प्रथम राज्यसभेत हे विधेयक मांडायचा निर्णय घेतला, असेही शहा म्हणाले.
व्यैंकय्या नायडू यांच्या विद्यार्थीदशेतील राजकारण आणि अध्यक्षपदी असताना काश्मीरबाबत पक्षाच्या विचारधारेला अनुसरण्याच्या आठवणींनाही शहा यांनी उजाळा दिला.