नवी दिल्ली – भारताच्या 23 वर्षाखालील संघाने आशियाई व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानवर 21-25, 25-16, 25-22, 25-18 असा विजय मिळवला. त्यासोबतच भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताचा सामना रविवारी चायनीज तैपेईसोबत होणार आहे.
यासह भारताने 23 वर्षांखालील गटाच्या व्हॉलिबॉल विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे. म्यानमारमध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे. उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पहिला सेट गमावल्यावर पाकिस्तानला 21-25, 25-16, 25-22, 25-18 अशी मात दिली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर कोणत्याही खेळात भारत-पाकची ही पहिलीच लढत होती.
तिसऱ्या सेटमध्ये शेवटच्या क्षणांमध्ये पाकिस्तानकडे 21-20 अशी आघाडी होती, परंतु त्यांचे तीन फटके बाहेर गेले आणि भारताने 25-22 अशी बाजी मारली. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पिछाडीवरून मात दिली होती.