मुंबई: राज्यातल्या सांगली, कोल्हापुर, सातारा या भागात पुराच्या भयंकर आपत्तीला राज्याच्या प्रशासनाचेच अपयश कारणीभूत आहे आणि त्यांनी ही चूक मान्यच केली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी केले. एका दूरचित्रवाणीवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन आधीच करण्याची पद्धत असते पण ती पद्धतच पाळली गेली नाही. महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील समन्वया अभावी ही स्थिती गंभीर बनली असे त्यांनी नमूद केले.
सन 2005 साली अशीच स्थिती उद्भवली होंती. त्यातून प्रशासन काहीच शिकले नाही. आत्ता अलमट्टीतून पाणी सोडले जात आहे पण हे जर आधीच समन्वयाने झाले असते तर ही वेळच उद्भवली नसती असे ते म्हणाले. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर पुर्व तयारी करायला हवी होती पण तीही झाली नाही असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
राजकीय नेतृत्वाने प्रशासनाला सारखे प्रश्न विचारून या स्थितीचा आढावा घेतला पाहिजे होता. असा आढावा वेळीच घेतला गेला असता तर ही वेळच आली नसती असेही त्यांनी सांगितले. या स्थितीला प्रशासनातील जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.