हिमांशू
श्रीमंतीचं आकर्षण नसलेला माणूस शोधून सापडायचा नाही. कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपली सांपत्तिक स्थिती चांगली असलीच पाहिजे, या वेडानं आपल्याला झपाटलेलं असतं. या मानसिकतेला काही अंशी सामाजिक परिस्थितीही जबाबदार असते. भरपूर पैसा राखून असलेल्या माणसानं तो कसा कमावला, हे आपल्या दृष्टीनं आता तितकंसं महत्त्वाचं राहिलेलं नाही. पैसा आहे आणि येतोय एवढंच महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या या मानसिकतेची लिटमस टेस्ट घ्यायची झाली, तर टीव्हीवर आपल्याला काय पाहायला आवडतं, हा प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो.
टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आलिशान घरं, श्रीमंतीचं झगमगाटी प्रदर्शन, झकपक कपडे घातलेली माणसं, त्यांच्या मालकीच्या कंपन्या हे सगळं आपल्याला दिसतं. आलिशान घरात नातेसंबंध मोडकळीला आलेले असतात आणि भव्य कंपन्यांमध्ये अधिकारीपदासाठी साठमारी चाललेली दिसते. काळ्या, पांढऱ्या, करड्या रंगात रंगवलेल्या व्यक्ती वेगळीच मूल्यव्यवस्था आपल्याला बेमालूम देत असतात. टीव्हीवर आपल्या घरासारखं घर दिसलं, तर आपल्याला ते फारसे रूचत नाही. व्यवहारातसुद्धा आपल्याला पैसेवाल्या मित्रासोबत राहायला आवडते; परंतु त्याने तो पैसा गैरमार्गानं मिळवल्याचं जेव्हा सिद्ध होते आणि तो अडचणीत येतो, तेव्हा एकेक मित्र त्याच्यापासून दुरावत जातो. जोवरी पैसा, तोवरी बैसा… दुसरं काय!
हेच पाहा ना, सोन्याचे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यांपुढे ग्रॅम आणि तोळा यापेक्षा मोठी परिमाणं येत नाही; परंतु एखाद्याच्या घरात किलोच्या हिशेबात सोने सापडले, तर त्या बातमीकडे आपण डोळे विस्फारून पाहतो. आय मॉनेटरी ऍडव्हायजरी म्हणजे आयएमए पॉन्झी घोटाळ्यातला मुख्य आरोपी मन्सूर खान दुबईहून दिल्लीत आला आणि त्याला अटक झाली. बंगळुरूतल्या त्याच्या घरावर छापा पडला, तेव्हा तीनशे तीन किलो म्हणजेच तब्बल तीन क्विंटलपेक्षा जास्त सोनं सापडलं. या महाशयांनी ते कुठे लपवून ठेवलं असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
पठ्ठ्यानं स्वीमिंग पुलच्या तळाखाली हे सोने लपवून ठेवल्याचे आढळले. या मन्सूर खानवर तीस हजार लोकांना फसवल्याचा आरोप आहे; परंतु बातमी पाहताना आपल्याला ही तीस हजार माणसे दिसत नाहीत. दिसतं ते फक्त सोनं. खरं तर ज्यांची फसवणूक झाली, ती आपल्यासारखीच माणसं असतात. ती आपल्याला दिसली नाहीत, तर उद्या आपणही अशाच कुठल्यातरी फसवणुकीला बळी पडणार, हे गृहीत धरून चालावं. कारण अशा पॉन्झी योजना जाहीर करणारे आपल्याला झटपट श्रीमंतीचं आमिष दाखवतात. फसवणारा दोषी आहेच; परंतु फसणाराही तेवढाच दोषी ठरतो. फसवणूक करणारा आपले पैसे घेऊन फरार झाला, की मगच आपले डोळे उघडतात. तोपर्यंत फक्त झगमगाट आपल्याला दिसत असतो.
श्रीमंती पाहण्याची सवय एकदा जडली, की सुख आणि समाधान यातला फरक धूसर होतो. घराच्या बाबतीत आपण वन-बीएचके किंवा टू-बीएचकेची स्वप्नं रंगवत असतो. पण निक जोन्स आणि प्रियांका चोपडा यांनी त्यांचं पाच बेडरूमचं घर लहान पडतं म्हणून 6.9 दशलक्ष डॉलरला कसं विकलं आणि दोन कोटी डॉलर बजेट ठेवून आणखी मोठं घर ते कसं शोधतायत, याची बातमी आपल्या आकर्षणाचं केंद्र ठरते. नेमका इथंच घोटाळा होतो.