राज्यावरील संकटाची दिली माहिती
बारामती- महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढतो, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
राज्यातील पूरपरिस्थितीबाबत शरद पवार यांनी पंतप्रधानांशी बोलावे, अशी विनंती पूरग्रस्त सांगलीतील नागरिकांनी केली होती. त्यानुसार आज पवार यांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन राज्यातील पूरपरिस्थितीच्या भीषणतेची माहिती त्यांना दिली.
आलमट्टी धरणातून पाच लाख क्यूसेकने पाणी सोडणे गरजेचे असताना ते पुरेशा प्रमाणात सोडले जात नाही. पाण्याच्या फुगवट्यामुळे सांगलीला पुराचा तडाखा अधिक तीव्रतेने बसला आहे, या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढावा, अशी विनंती पवार यांनी मोदी यांना केली आहे. राज्यातील पूरग्रस्तांना केंद्राकडूनही सर्वतोपरी मदतीबाबतही पंतप्रधान सकारात्मक आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मी या बाबत बोललो असल्याचे पवार यांनी सांगितले.
कोल्हापूर व सांगलीची परिस्थिती अजूनही फारशी सुधारलेली नाही. सांगली येथे पलूसनजीक जी दुर्घटना घडली, त्या भागाला भेट देण्यासाठी मी जाणार असून त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्या पध्दतीने मदत करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. चाळीस डॉक्टरांचे पथक तसेच औषधं गोळा केली असून ती पूरग्रस्त भागात पाठविणार आहोत, काही प्रमाणात धान्य व इतरही मदत गोळा केली असून तीही पाठविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
- संकटग्रस्तांना मदतीस प्राधान्य…
पूरग्रस्तांना मदत करणे हेच आपले पहिले काम आहे, या परिस्थितीत आम्ही कसलेही राजकारण करणार नाही, या कठीणप्रसंगी पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे सर्वांचेच कर्तव्य असून सर्वांनी यात सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.