तीन केंद्रशासित प्रदेशांना आहे विधानसभा
नवी दिल्ली- भारतीय संघराज्यात (रिपब्लिक ऑफ इंडिया) विधानसभा असलेली विविध राज्ये आणि काही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रशासित प्रदेश (युनियन टेरिटरीज) यांचा समावेश आहे. नुकतेच राज्यघटनेतील कलम 370 आणि कलम 35 ए हटवून केंद्रसरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. त्यामुळे देशात आता 29 ऐवजी 28 राज्ये आणि सात ऐवजी 9 केंद्रशासित प्रदेश असतील.
जम्मू-काश्मीर तसेच लडाख अशा दोन प्रदेशांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आल्याने या राज्यांवर वा भागांवर थेट केंद्र सरकारचे नियंत्रण असेल. त्यापैकी जम्मू व काश्मीर या राज्यासाठी विधानसभा असेल. पण, पूर्वी भारतातील विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या लडाखसाठी मात्र विधानसभा नसेल. या दोन्ही राज्यांमध्ये यापुढे नायब राज्यपाल राज्यकारभार करतील.
सध्या देशात दिल्ली, चंदीगड, पॉंडीचेरी, लक्षद्वीप, दादरा-नगर हवेली, अंदमान-निकोबार तसेच दीव व दमण हे केंद्रशासित प्रदेश असून, त्यापैकी फक्त दिल्ली व पॉंडीचेरीमध्ये विधानसभा आहे. म्हणजेच आता 9 पैकी तीन केंद्रशासित प्रदेशांत विधानसभा असेल. चंदीगड शहर हे केंद्रशासित प्रदेश असले तरी ते हरयाणा तसेच पंजाब अशा दोन राज्यांची राजधानीचे शहरही आहे.
भारत वर्ष 1947 मध्ये स्वतंत्र झाला, तेव्हा सर्व भागांत ब्रिटिशांची सत्ता नव्हती आणि काही प्रदेश पूर्ण राज्य म्हणून आर्थिक व राजकीयदृष्टया स्थिर राहतील, अशी शक्यता नव्हती. त्यामुळे त्या भागांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्यात आला होता. त्यासाठी वर्ष 1956 मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली आणि राज्य पुनर्रचना कायद्यांद्वारे काही केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी अंदमान-निकोबार, लक्षद्वीप व दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. दादरा-नगर हवेलीची निर्मिती वर्ष 1961 मध्ये तर पॉंडीचेरी व दीव-दमण ची निर्मिती वर्ष 1962 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर वर्ष 1966 मध्ये चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
पॉंडीचेरीवर फ्रेंचांचे साम्राज्य होते, तर गोवा, दीव-दमण, दादरा-नगरहवेली यांवर पौर्तुगिजांचे राज्य होते. त्यामुळे हे दोन्ही भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करताना वेगवेगळे निकष लावण्यात आले. अंदमान-निकोबार तसेच लक्षद्वीप हे भारताचे भाग असले तरी, ती वेगळी बेटे आहेत आणि देशाच्या मूळ भूभागापासून दूर आहेत. मात्र ती सागरी व्यूहरचनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. दादरा-नगर हवेली, दीव-दमण व पॉंडीचेरी येथील संस्कृती आसपासच्या राज्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे.