कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात पुराची गंभिर परिस्थिती निर्माण झाली असून या पुरपरिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हवाई पाहणी केली. देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्यतील पुरपरिस्थितीचही प्रत्यक्ष पाहणी करणार होते तथापी खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी न मिळल्याने हवाई पाहणी करावी लागली.
अतिवृष्टी आणि धरण प्रकल्पातील विसर्गामुळे सांगली जिल्ह्यात गंभिर पुरपरिस्थिती निर्माण झाली असून या पुरपरिस्थितीत पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रशासनास राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व बोटी आणि टीम्स उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सांगलीतील पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, गोवा कोस्टलच्या बोटी बरोबरच देशाच्या अन्य राज्यातूनही टीम मागविल्या जात आहेत. पुराने वेढा दिलेल्या गावातील पुरग्रस्तांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी हालविण्यावर शासनाने लक्ष केंद्रीत केले असून यासाठी केंद्र शासनाचीही मदत घेतली जात आहे.
सांगलीतील पुराचे पाणी कमी व्हावे यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आजच चर्चा केली असून त्यांनी अलमट्टीचा विसर्ग आज सायंकाळपर्यंत 5 लाख क्युसेक करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे सांगलीतील पुराच्या पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यापुढील काळातही या दोन्ही राज्यामध्ये आवश्यक तो समन्वय ठेवून पुर परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर अधिक भर दिला जाईल, असे ते म्हणाले.