कोल्हापूर- गेल्या 10 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पर्यंत 51 हजार पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अद्याप देखील कोल्हापूरच्या पंचगंगेच्या महापुराची स्थिती कायम आहे.
अनेक गावांना पुराचा वेढा बसलेला आहे. यात 1 हजार हुन अधिक नागरिकांची सुटका करण्यासाठी आर्मी, नेव्ही इंडियन एअर फोर्स, पोलीस दल हे आता प्रयत्न करताना दिसत आहेत. चिखली, आंबेवाडी येथे अडकलेल्या लोकांसाठी आर्मीचे आणखी काही सुसज्ज टीम्स कोल्हापुरात मदतीसाठी येणार असल्याचं कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. तसेच कोल्हापूरच्या पूरस्थिती बाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील आपले बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या गावात बोटी जाणे शक्य नाही त्या ठिकाणी एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.