-माधव विद्वांस
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सृजनशील लेखिका डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील झापडे गावी 7 मार्च 1915 रोजी झाला.कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे महाद्वाराचे उजवीकडे दोन-तीन दुकाने ओलांडल्यावर त्यांच्या नावाचा बोर्ड दिसत असे. 1935 मध्ये डॉक्टर झाल्यावर त्यांचे वास्तव्य काही दिवस बडोद्याला होते. इ.स. 1945 साली उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या व नंतर कोल्हापुरात स्थायिक होऊन त्यांनी वैद्यकव्यवसाय केला.
त्यांची पहिली कादंबरी “आधार’ दवाखान्यातील वातावरणावर आधारित होती. त्यांच्या कादंबऱ्यातून त्यांनी स्त्रियांच्या पिळवणुकीला वाचा फोडली. त्यांनी मराठी व गुजराथी भाषेत विपुल लेखन केले. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट तसेच छोट्या पडद्यावर मालिकाही झाल्या आहेत. 48 कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. पांचाली, नल-दमयंती, मखमली बटवा, चतुरा, अग्निदिव्य, बाभळीचे काटे, पुनर्जन्म, बंदिनी, श्रीकृष्ण अशा अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. त्यांचे नाव “युगंधरा’ या कादंबरीमुळे सर्वदूर झाले. स्वतःचे जीवन दुसऱ्यासाठी अर्पण करणाऱ्या बहिणीची कथा या कादंबरीत अत्यंत उत्कटतेने रंगविली आहे. यातील नायिका अत्यंत हुशार, हरहुन्नरी, आई-वडिलांची लाडकी लेक, दोन भावांची लाडकी बहीण असते. वडिलांच्या संसाराची जबाबदारी युगंधरा तिच्या खांद्यावर उचलते. भावांचे शिक्षण, लग्न सर्व काही ती करते. मात्र, भावंडांचे संगोपन करीत असताना त्यात स्वतःच्या प्रेमाची आहुती देते. “माझिया माहेरा’ ही मालिका याच कादंबरीवर आधारित होती.
“महाश्वेता’ ही डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची आणखी एक भावस्पर्शी कादंबरी. या कादंबरीत एका सुंदर तरुणीचे अंगावर कोड आल्यानंतर बदललेले जीवन आणि तिचा संघर्ष याच्यावर आधारित आहे. या कादंबरीवर आधारित मराठी मालिकासुद्धा झाली आहे. कोड आलेल्या मुलीच्या मनाच्या अवस्थेचे डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांनी हृदयस्पर्शी वर्णन केले आहे, तसेच अशा व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही दाखविला आहे. त्या स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांचा पेशंटकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि सहानुभूतीही त्यातून प्रकट होते.
त्यांनी पौराणिक कथेतील अनेक नायिकांवर लेखन केले. महाभारतातील गांधारीवर “सत्यप्रिय गांधारी’ या कादंबरीतून त्यांनी गांधारीचे चांगले गुण वाचकांसमोर आणले आहेत. द्रौपदीच्या जीवनावर आधारित “याज्ञसेनी’ ही कादंबरी लिहून द्रौपदीच्या मनाची अवस्था त्यांनी दाखविली आहे. त्यांनी पौराणिक कथेवरील कादंबऱ्या लिहिताना तत्कालीन राजस्त्रियांना तसेच इतर स्त्रियांना मिळणाऱ्या समाजाचा, कुटुंबातील लोकांची दुय्यम वर्तणूकही त्यांनी प्रभावीपणे पुढे आणली आहे. या सरस्वतीस्वरूप सिद्धहस्त लेखिकेचे 8 ऑगस्ट 1998 रोजी कोल्हापूर येथे वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.