पुणे -धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. त्यामुळे विसर्ग सुरू असल्याने नद्यांना महापूर आला आहे. पुढील काही तास हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले आहे.
गेले काही दिवस धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे शंभर टक्के भरली असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवावा लागत आहे. संसद अधिवेशनात असल्याने महापालिका पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असल्याचे बापट यांनी कळवले आहे.
या आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जात आहे. मात्र, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नद्यांची पाणी पातळी जास्त आहे. कोणत्याही क्षणी पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने पूर पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी पाण्याजवळ न जाता सुरक्षितता बाळगावी, असे आवाहनही बापट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.