दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत सुमारे दीडशेहून अधिक प्रकल्प कार्यान्वित आहेत. यातील बहुतांश कंपन्या रासायनिक आहेत. या प्रकल्पांच्या विस्तृत जागेत ठेवलेल्या मालावर डल्ला मारण्याचे काम औद्योगिक परिसरात सध्या सुरू असून, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका कंपनीचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे पाइप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. करोडो रुपयांचे प्रकल्प या कंपन्या उभारत आहेत, मात्र सुरक्षितेच्या धोरणाबाबत त्यांच्याकडून उदासीनता आहे. याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यास कंपन्या तयार नाहीत.
कुरकुंभ औद्योगिक परिसरातील कंपन्यांना पोलिसांनी सुसज्ज सुरक्षा यंत्रणा उभी करण्याचे निर्देश अनेकवेळा वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून दिले आहेत. मात्र, व्यवस्थापनाकडून पोलिसांनी दिलेले निर्देश गांभीर्याने घेतले जात नसल्याचे परिसरात होणाऱ्या चोऱ्यांवरून समोर येत आहे, त्यामुळे पोलिसांना चोरीचा तपास करताना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी सुरक्षेची खबरदारी म्हणून प्रत्येक कंपन्यांच्या बाहेर सीसीटीव्ही लावले तर संपूर्ण औद्योगिक वसाहत सीसीटीव्हीच्या कक्षेत येण्यास मदत होईल. मात्र, याबाबतही कंपनी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या परिसरात अनेक रासायनिक कंपन्या असल्याने येथे हजारो कामगार आणि त्यावर आधारित व्यवसाय या परिसरात आहेत. येथे असणाऱ्या कामगारांची पडताळणी झाली की नाही हा एक भाग आहे. कारण यातील बहुतांश कामगार हे परप्रांतीय आहेत. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक पदार्थाच्या चोरीपासून दुचाकींच्या चोरीच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. लघुउद्योगांमध्ये भुरट्या चोऱ्या होत आहेत, तरी या कंपन्यांकडून सुरक्षारक्षक नेमले जात नाहीत. औद्योगिक वसाहतीत चोऱ्या रोखायच्या असतील तर प्रत्येक कंपनीने आपल्या गेटच्या बाहेर सीसीटीव्ही लावून त्याचे कनेक्शन पोलिसांना दिले, तर चोऱ्यांना निश्चितच आळा बसेल मात्र यासाठी आता पोलिसांनीच सक्ती करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
Baap re