नगर, (प्रतिनिधी) – महिलेच्या ४ लाख ४ हजार रूपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी अहमदनगर ते शेवगाव प्रवासा दरम्यान झाली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्मिता कल्याण पागर (रा. रेणुकानगर, केडगाव) या नातेवाईकाच्या लग्नासाठी गुरूवारी (दि.२) सकाळी साडे नऊ वाजता माळीवाडा बसस्थानकात आल्या. त्यांच्यासमवेत इतर नातेवाईक ही होते.
त्या शेवगावला जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. शेवगाव येथे सकाळी ११ वाजता गाडगेबाबा चौक, आखेगाव रस्ता येथे उतरल्या. त्या माहेरी गेल्यावर त्यांनी लग्नसमारंभात दागिने घालण्यासाठी पर्स उचकली असता त्यामध्ये दागिने नव्हते.
सहा पदरी टेम्पल डिझाईनचे गंठण (किंमत ३ लाख ८० हजार) आणि कानातील टॉप्स (२४ हजार) असे ४ लाख ४ हजार रूपये किंमतीचे दागिने चोरीला गेले होते. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे