पिरंगुट- मुळशी तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. धरण 93 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून 3500 क्युसेक वेगाने मुळा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि. 2) सकाळी मुळशी धरण 93 टक्के भरले होते. त्यामुळे धरणातून दुपारी साडेबारा वाजता 1000 क्युसेक पाणी सोडण्यात आले. मात्र धरण भागात पावसाचा जोर असल्याने संध्याकाळी सात वाजल्यापासून 3500 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या ,वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. वीजेवरील मोटारी, इंजिने शेती अवजारे योग्य त्याठिकाणी ठेवावी. तसेच जनावरांना योग्य ठिकाणी हालवावे. कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन टाटा पॉवर प्रशासन व मुळशी तहसीलदार कार्यालयांच्या वतीने करण्यात आले आहे.