कराड – कॉंग्रेसला अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातच नाही तर देशातही माणूस सापडेना झाला आहे. कॉंग्रेस म्हणजे डुबती नाव झाली असून, या नावेत बसायला कोणीच तयार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर मंडळी भाजपात यायला तयार असून, त्यातील काहीजण माझ्याही संपर्कात आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी भाजपाची बस आता फुल्ल भरल्याने निवडकच लोकांना घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या काळात जिल्ह्यावर भाजपाचा झेंडा नक्कीच फडकेल असा विश्वास, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
कापील (ता. कराड) येथे आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटन व भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोपटराव जाधव होते. ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, जयंत पाटील, जगदीश जगताप, धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, पै. शिवाजीराव जाधव, आनंदराव मोहिते, प्रियांका ठावरे, शामबाला घोडके, राजू मुल्ला उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्या 5 वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने खऱ्या अर्थाने विकास केला आहे. सरकार अनेक योजना विचारपूर्वक राबवत असून, त्यामुळे तळागाळातील लोकांना लाभ मिळत आहेत. दक्षिणचा गतिमान विकास करण्यासाठी अतुलबाबांना येत्या विधानसभेला आमदार म्हणून निवडून आणायचे आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पिनू जाधव यांनी प्रास्तविक केले. रवींद्र सावंत यांनी आभार मानले.