-विठ्ठल वळसे पाटील
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ ही लोकमान्यांची सिंहगर्जना स्वातंत्र्याचा मूलमंत्र देऊन गेली. “स्वराज्य’ या एका घोषणेने संपूर्ण हिंदुस्थान ब्रिटिश सरकार विरोधात जागा होऊन स्वातंत्र्याचा हक्क मागू लागला. टिळकांच्या विचारातील “स्वराज्य’ आज त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आठवूया…
लोकमान्यांनी ब्रिटिश सरकार घालवण्यासाठी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा वापर केला. स्वदेशी वस्तूंची खरेदी, स्वराज्य अर्थात होमरुल्स, परदेशी मालावर बहिष्कार आणि एकात्मतेसाठी राष्ट्रीय शिक्षण गरजेचे मानले आणि एक स्वातंत्र्य पर्व सुरू झाले. सन 1818 साली पुणे येथे शनिवार वाड्यावरील भगवे निशाण उतरून युनियन जॅक चढला. संपूर्ण हिंदुस्थान ब्रिटिश अधिपत्याखाली आला. एक-एक संस्थान खालसा करण्यात आले. अखेर 1857ला स्वातंत्र्यसमर लढले गेले; पण यात यश आले नाही.
टिळकांचा जन्म सन 1856 सालचा. इतिहासाची आवड असल्याने स्वातंत्र्याविषयी ते अधिक संवेदनशील होते. चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्यात टिळकांना कुठेच राष्ट्रीय एकोपा दिसत नव्हता. अनेक संस्थानिक ब्रिटिशांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते, तर स्वातंत्र्याविषयी जनतेत भावना नव्हती, एक प्रकारे मरगळ आली होती. ती घालवण्यासाठी टिळकांनी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा आक्रमकपणे पुरस्कार केला. यातून त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात केली आणि स्वराज्य या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले. त्यानंतर देशभर जहाल विचारांचे देशभक्त तयार होऊ लागले.
लोकमान्य टिळक शैक्षणिक धोरणाबाबत नेहमी अग्रेसर होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा शाळा काढण्याचा मानस लोकमान्य टिळक, आगरकर तसेच नामजोशी, करंदीकर यांनी 1 जानेवारी 1880 साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करून पूर्ण केला. शालेय शिक्षण स्वस्त करण्याचा हेतू बाळगला गेल्याने न्यू इंग्लिश स्कूल प्रसिद्धीस आली. यातून पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभी राहिली. याच संस्थेने 2 जानेवारी 1885ला फर्गसन कॉलेज निर्माण केले.
टिळकांनी 1890 साली “केसरी’ व “मराठा’ वृत्तपत्रे सुरू केली. शैक्षणिक कार्याबरोबर टिळकांनी पत्रकारितेचा आरंभ केला. पुढे संस्कृतीवर होणारे आक्रमण पाहून टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. पुढे संस्कृतीबरोबर राष्ट्रभावना वाढीस लागावी म्हणून 1896 साली शिवजयंती रायगडावर साजरी करून तिला सार्वजनिक स्वरूप दिले. 1896 साली भयंकर दुष्काळ पडला. यात टिळकांनी “दुष्काळात कर देण्याची आवश्यकता नाही व जमा करण्यात आलेला दुष्काळ विमा निधी दुष्काळग्रस्त लोकांना मिळावा’ याबाबत जनजागृती केली. तसेच धनिकांना अन्नधान्य व पैसा दान करण्याचे आवाहन केले. त्यात 1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. जुलमी रॅन्डने उच्छाद मांडला होता. ही साथ आटोक्यात आणण्याचा हेतू टिळकांचा होता. परंतु रॅन्ड काही केल्या ऐकत नव्हता. अखेर रॅन्ड व त्याचा साथीदार आयर्स्ट यास चापेकर बंधूंनी ठार मारले. या प्रकरणात टिळकांना ब्रिटिश सरकारने अटक करून बारा महिन्यांचा कारावास दिला.
ब्रिटिशांची आर्थिक कोंडी व्हावी, म्हणून परदेशी मालावर बहिष्कार, परदेशी मालाची होळी करणे असे राष्ट्रीय कार्यक्रम आयोजले. 1905 साली टिळकांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कपड्यांची होळी केली. याची धग हवी तशी ब्रिटनला पोहोचली. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ “राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे?’ हे अग्रलेख प्रसिद्ध झाले आणि ब्रिटिशविरोधी जनाधार तीव्र झाला. वर्तमानपत्रातून टिळकांनी सरकारविरोधी टीकेची झोड उठवली, हे सरकारने लक्षात घेऊन 24 जून 1908 रोजी टिळकांवर राष्ट्रद्रोहाचा खटला भरून सहा वर्षांच्या शिक्षेसाठी त्यांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी केली. सहा वर्षांचा प्रदीर्घ तुरुंगवास भोगून 17 जून 1914 रोजी त्यांची सुटका झाली आणि टिळक पुन्हा राजकारणात सक्रिय झाले.
राजकीय हक्क आणि भारतातील प्रातिनिधिक संस्थांच्या, अधिकारामध्ये वाढ केली पाहिजे इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी 1 मे 1916 रोजी टिळकांनी मुंबई प्रांतात “होमरूल लीग’ची स्थापना केली. पुढे सप्टेंबर, 1916मध्ये ऍनी बेझंट यांनी “ऑल इंडिया होमरूल लीग’ ची स्थापना केली. या संघटनांमध्ये परस्पर समन्वय चांगला होता. “होमरूल’साठी “स्वराज्य’ हा शब्द वापरून टिळकांनी भाषेचे महत्त्व वाढवले. टिळकांच्या बेळगाव आणि अहमदनगर भाषणांत स्फोटक वक्तव्ये ब्रिटिश सरकारच्या कानी गेले. टिळकांवर राजद्रोही वक्तव्यांसाठी खटला भरला. खालच्या कोर्टातील विरोधात गेलेला निकाल उच्च न्यायालयात बॅ. जिनाच्या युक्तिवादांमुळे जिंकता आला. या महापुरुषाने तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करून देशांत नवजागृती निर्माण केली. अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी या महापुरुषाचा जीवनदीप मालवला.
टिळकांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती या दोन प्रेरणा सणांतून संस्कृती व राष्ट्राभिमानी पिढी निर्माण होऊ लागली. परंतु यातून प्रबोधनात्मक कार्य हाती घेण्याऐवजी अनेक युवाशक्ती याकडे मनोरंजनात्मक दृष्टिकोन बाळगून आहे. संस्कृती व राष्ट्राभिमान टिकवायचा असेल तर लोकमान्य टिळकांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेत माझाही वाटा असल्याची भावना जागृत झाली पाहिजे.