वालचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे साधणार संवाद
बीडमध्ये महिलांसाठी तर हदगावमध्ये शेतकऱ्यांशी होणार आदित्य यांचा संवाद
सोलापूर (प्रतिनिधी) – युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्याचा प्रारंभ आज बुधवारपासून सोलापुरातून होत आहे. आदित्य हे सकाळी साडेदहा वाजता सोलापुरातील वालचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य सिद्धेश कदम , दुर्वेश सरनाईक , रुपेश कदम आणि साईनाथ दुर्गे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
त्यानंतर उस्मानाबाद येथेसुद्धा आदित्य यांचा संवाद होणार आहे. बीडमध्ये महिलांसाठी तर हदगावमध्ये शेतकऱ्यांशी आदित्य संवाद साधतील असेही त्यांनी सांगितले. जळगाव ते नाशिक या पहिल्या टप्यातील जनआशीर्वाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्यातील यात्रेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. मंगळवारी सोलापूर आणि उस्मानाबाद, त्यानंतर 1 आणि 2 ऑगस्ट रोजी लातूर,नांदेड आणि परभणी तसेच 3 ऑगस्ट रोजी परभणी शहर व हिंगोली आणि 4 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील विभागात जनआशीर्वाद यात्रा होणार आहे.
या यात्रेच्या दरम्यान विजय संकल्प मेळावा, गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकसभा , शेतकरी , महिला , विध्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत युतीला केलेल्या मतदानाबध्दल आभार मानण्यासाठी व ज्या मतदारांनी मतदान केले नाही त्यांची माने जिंकण्यासाठी हि यात्रा असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे समन्वयक प्रमुख प्रा . शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर , संभाजी शिंदे, शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले , चरणराज चवरे , नगरसेवक मनोज शेजवाल, विठ्ठल वानकर , मनीष काळजे , बाळासाहेब गायकवाड, शिवराज झुंजे यांच्यासह सेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळाबाबत सेना गंभीर आणि खंबीर –
राज्यात दुष्काळाची मोठी झळ शेतकऱ्यांना बसत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. आतापर्यन्त जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय केली आहे. शिवाय चारा छावणीवरील शेतकऱ्यांना धान्य आदींची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाबाबत शिवसेना गंभीर आणि खंबीरसुद्धा असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना युवा सेनेच्या कोअर कमिटी सदस्यांनी सांगितले.