“कठीण होत असलेल्या कारगिल युद्धासाठी हवाई दलाचा वापर करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि 26 मे 1999 साली श्रीनगर, अवंतीपुरा आणि अदमपूर विमानतळावरून हवाईदलाच्या विमानांनी पहिले उड्डाण भरले. मिग प्रकारातील ही विमाने शत्रूंच्या तळावर हल्ला करून, त्यांचे शस्त्रास्त्र नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले होते. कारगिल युद्धाचे आश्चर्यकारक यश खेचून आणण्यात लष्कराबरोबरच भारतीय हवाई दलाची भूमिकाही महत्त्वाची होती. या युद्धाला आज 20 वर्षे पूर्ण होत असताना, हवाई दल आजही तितक्याच सक्षमतेने वाटचाल करत असून नुकतीच भारताने यशस्वीपणे पार पाडलेले “एअर स्टाइक’ हे त्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.
कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्याचे सुमारे 600 सैनिक शहीद झाले. उंच डोंगराळ भागात लढण्यात आलेल्या युद्धातील विजय हा असंभवातून खेचून आणलेला मानला जातो. अतिशय बिकट परिस्थितीत, भारतीय सैन्याने हा विजय खेचून आणला. यामध्ये हवाई दलाची भूमिका देखील महत्त्वाची होती.
युद्धानंतर भारतीय सैन्यातर्फे “कारगिल वॉर रिव्ह्यु कमिटी’ या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अहवालात भारतीय हवाई दलाची क्षमता वाढविण्याची तसेच संयुक्त लष्करी मोहिमांवर भर देण्याची गरज असल्याचे नमूद केले. त्यानुसार संरक्षण मंत्रालयातर्फे भारतीय हवाई दलाची क्षमता वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू आहे.
सद्यस्थितीत भारतीय हवाई दलाकडे मिराज 2000, सुखोई 30 एमकेआय, जॅग्वार, मीग प्रकारातील लढाऊ विमाने, मिग प्रकारातील अत्याधुनिक विमाने या व्यतिरिक्त विविध हेलिकॉप्टर्स, मालवाहतूक विमाने अशी विविध स्वरूपातील विमाने आहेत. नुकतेच हवाई दलाच्या ताफ्यात अमेरिकन बनावटीच्या “अपाचे’ या हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे.