भाजपा प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांचा दावा
बंगळुरू : गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा आज शेवट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुमारस्वामी सरकारने सादर केलेल्या विश्वासमत प्रस्तावावर आज मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे कर्नाटकचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी आजचा दिवस हा कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस असल्याचा दावा यांनी केला आहे.
कॉंग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार अडचणीत आले आहे. हे सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कुमारस्वामी यांनी बंडखोर आमदारांना सभागृहात येऊन भाजपाचे पितळ उघडे पाडण्याचे आवाहन केले आहे. मात्र संबंधित बंडखोर आमदारांनी विधानसभा सभागृहात येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. यादरम्यान, कॉंग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा मागे घेणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन कुमारस्वामी सरकारला विधानसभेत तत्काळ बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. ही याचिका आज सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयासमोर येण्याची शक्यता आहे.