नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी यांचीच नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षा मध्य प्रदेशचे मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी व्यक्त केली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले सज्जन सिंह वर्मा यांनी म्हटले की, कॉंग्रेसचे रक्त धमन्यांमध्ये असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष नेहरू-गांधी कुटुंबीयांव्यतिरिक्त पाहणे अशक्य आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की प्रियांका गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या भविष्यातील वाढीसाठी याची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याने मी राजीनामा दिला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांनी अधिकृतपणे राजीनामा देण्याआधी गांधी कुटुंबाच्या समर्थनार्थ आणि पक्षाची पुनर्रचना करताना मोकळीक मिळावी यासाठी पक्षातील 120 विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते. राहुल यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लोकसभेसाठी त्यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांना आपला करिष्मा दाखवता आला नव्हता.